रायगड जिल्हास्तरीय कवी संमेलनाचे रमाकांत जोशी यांच्या हस्ते उदघाटन
उरण, दि.१(विठ्ठल ममताबादे): रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय-पिरकोन, तालुका उरण येथे कृ. द. जोशी सभागृहा मध्ये नूतन वर्षाच्या स्वागता निमित्त रायगड जिल्हास्तरीय कवी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. सदर कवी संमेलनाचे उद्घाटन पिरकोन ग्रामपंचायतचे सरपंच रमाकांत जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.
विदयार्थ्यांना शालेय-महाविद्यालयीन जीवनापासूनच कवितेची आवड निर्माण व्हावी, कविता लिहिण्याची, वाचनाची आवड निर्माण करावी. विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक कौशल्य विकसित करावे या दृष्टीकोनातून पिरकोन येथे रायगड जिल्हास्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्षीय भाषणात जेष्ठ साहित्यिक ए. डी. पाटील यांनी दिली. यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक रायगड भूषण ए. डी. पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबईचे सदस्य एल. बी. पाटील, साहित्यिक गणेश कोळी, विद्यालयाचे चेअरमन जीवन गावंड, प्राचार्य वेटम व्ही. एस., डॉ. आर. बी. राठोड, जुनिअर कॉलेज प्रमुख गाढे बी. आर., विद्यालयाचे सचिव समता पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी गोपाळ पाटील, ज्योत्स्नाताई राजपूत, रंजना केणी, किशोर पाटील, सुजित डाकी, जगदीश पाटील आदी कविंनी सुंदर अशा कविता सादर केल्या. जेष्ठ कवी एल. बी. पाटील यांनी प्रेमावर कविता गायली. या कवितेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. कविता स्फूरते कशी? या विषयावर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे विद्यार्थी पूर्वा पाटील (८ वी अ), प्रवृत्ती पाटील (८ वी अ), रश्मी पाटील (८ वी अ), सुनेशा पाटील (१०वी अ), तन्वी पाटील (१०वी अ), भावना ठाकूर (१२वी वाणिज्य), सानिया पाटील (१२वी वाणिज्य), मानसी कोळी (१२वी वाणिज्य), सुप्रिया पाटील (११वी कला) यांनी कविता सादर केल्या. यावेळी इन्स्पायर अवॉर्ड शिष्यवृत्ती प्राप्त कु. भावेश मणिराम गावंड या विद्यार्थ्याचा जेष्ठ साहित्यिक ए. डी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मीनल पाटील तर आभार प्रदर्शन शिक्षक मनोहर म्हात्रे यांनी केले.
