“ग्रामीण रोजगार निर्मितीला सहाय्य होईल तसेच पर्यावरण संरक्षणाला हातभार लागेल” – नारायण राणे
नवी दिल्ली/मुंबई: केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काल कुमारअप्पा खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या अखत्यारीतील जयपूरच्या राष्ट्रीय हस्तनिर्मित कागद संस्थेने विकसित केलेल्या व गाईच्या शेणापासून बनवलेल्या जिवाणू रोधी घटकाची प्रक्रिया केलेल्या वस्त्राचे उद्घाटन केले. या वस्त्रावर जीवाणूची वाढ रोखली जाते.
हे कापड रुग्णालयात तसेच इतर प्रकारच्या वैद्यकीय वापरासाठी उपयुक्त आहे, असे उद्गार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी काढले. गाईच्या शेणापासून नाविन्यपूर्ण खादी प्राकृतिक रंगाचे उत्पादन केल्याबद्दल त्यांनी संस्थेची प्रशंसा केली.
या उत्पादनांत ग्रामीण रोजगार निर्माण करण्याची भरपूर क्षमता आहे त्याशिवाय त्यांच्यामुळे पर्यावरण संरक्षण होण्यास हातभार लागेल असे त्यांनी सांगितले. देशातील प्रत्येक गावात या प्रकारचा रंग उत्पादन प्रकल्प उभारता यावा म्हणून प्रयत्न केले जातील. असा प्रकल्प शाश्वत रोजगाराचे उदाहरण म्हणून दाखवता येईल असे ते म्हणाले.
खादी प्राकृतिक रंगासारख्या एकमेवाद्वितीय उत्पादनामुळे रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संरक्षण अशा दोन्ही उद्दिष्टे साधली जातील असे राणे म्हणाले. आपल्या मंत्रालयाकडून देशातील प्रत्येक गावात खादी प्राकृतिक रंग प्रकल्प उभारण्याचे लक्ष्य निर्धारित केले जाईल. यामुळे सरकारच्या ग्रामीण रोजगार निर्मिती उद्दिष्टे गाठण्यास वेग येईल, असे ते म्हणाले.
प्लास्टिक मिश्रित निर्मित कागद ग्रामीण भागातून उत्पादित करता यावा यासाठी प्रकल्प ग्रामीण भागात उभारता येण्याबाबतीतील व्यवहार्यता अधिकाऱ्यांनी पडताळून पहाव्यात अशा सूचना राणे यांनी केल्या.
पुनर्वापर न करता येण्याजोग्या प्लास्टिकचा भस्मासूर उभा राहिला आहे त्याचा नाश करण्यासाठी खादी ग्रामीण विकास महामंडळाने विकसित केलेला या हस्तनिर्मित कागद प्रकल्पाचा उपयोग होईल असे ते म्हणाले.
तर दुसऱ्या बाजूने निसर्गातील प्लास्टिक कचरा स्वच्छ होण्यासाठी, त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक हस्तनिर्मित कागद उद्योगाद्वारे ग्रामीण भागात हजारो नवीन उद्योग निर्माण होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ होण्यासाठी याचा वापर करता येऊ शकेल असे राणे यांनी स्पष्ट केले.