मुंबई, पुणेसह राज्यातल्या ‘या’ आठ शहरांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्याचे केंद्र सरकारचे निर्देश
मुंबई: मुंबई, पुणेसह राज्यातल्या आठ शहरांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवून, बाधितांचे तत्काळ विलगीकरण करण्याचे तसेच संपर्कात आलेल्यांचा तपास करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. या शहरांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे बरोबरच औरंगाबाद, नांदेड अहमदनगर, नाशिक आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे.
देशात संसर्गाचा दर सुमारे साडे पाच टक्के असताना, महाराष्ट्रात मात्र संसर्गाचा दर देशात सर्वाधिक २३ टक्के असल्याचे, याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, उद्यापासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना कोविड लसीकरण करता येणार आहे. कोविन संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या किंवा दुपारी तीन वाजेनंतर नजिकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन ओळखपत्र दाखवणाऱ्या नागरिकांना कोविड लस दिली जाणार आहे.