5जी तंत्रज्ञानामुळे ‘कोविड’चा फ़ैलाव होतोय का? वाचा दूरसंचार विभागाचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली/मुंबई: 5-जी तंत्रज्ञानाच्या मोबाईल टॉवर्सच्या चाचण्यांमुळे कोरोना विषाणूची दुसरी लाट येत आहे, असे दावे करून दिशाभूल करणारे अनेक संदेश विविध समाजमाज्यमांतून फिरत असल्याचे दूरसंवाद विभागाच्या लक्षात आले आहे. दूरसंवाद विभागाने जाहिर केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, हे संदेश खोटे असून, त्यांत अजिबात तथ्य नाही. 5जी तंत्रज्ञान आणि कोविड-19 चा फैलाव यांमध्ये कोणताही संबंध नसल्याचे सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी सांगण्यात येत आहे, असे त्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. याविषयी पसरणाऱ्या अफवा आणि खोट्या माहितीमुळे फसगत करून घेऊ नये, असे आवाहन जनतेला करण्यात येत आहे.
5-जी तंत्रज्ञान आणि कोविड-19 साथीचा संबंध जोडणारे दावे पूर्णपणे खोटे असून त्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. त्याशिवाय, अद्यापि भारतात कोठेही 5-जी नेटवर्कच्या चाचण्या सुरु करण्यात आल्या नसल्याची माहितीही देण्यात येत आहे. अर्थात, 5-जी तंत्रज्ञानाच्या चाचण्या किंवा त्याच्या नेटवर्कमुळे भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा दावा बिनबुडाचा आणि असत्य आहे.
आयनीकरण न करणाऱ्या वारंवारतांच्या रेडिओ लहरी, मोबाईलच्या मनोऱ्यांवरून उत्सर्जित होतात. त्यांच्यात अगदी सूक्ष्म विद्युतशक्ती असते आणि मानवासह कोणत्याही सजीवाच्या पेशींवर त्या कोणताही परिणाम करू शकत नाहीत. रेडिओ लहरींच्या संपर्कात येण्याच्या मर्यादांसंबंधीचे नियम दूरसंवाद विभागाने आखून दिले आहेत. या लहरींपासून संरक्षण देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय आयोगाने घालून दिलेल्या व जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलेल्या सुरक्षा मर्यादांच्या तुलनेत हे नियम दहापटीने अधिक कठोर आहेत.