देशातला सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न पुरस्कार. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ गायक भुपेन हजारीका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे देशाच्या राजकारणातील योगदान फार मोठे आहे. दरम्यान ज्येष्ठ गायक भुपेन हजारीका आणि नानाजी देशमुख यांनाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हजारीका यांना याआधी पद्मविभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. भुपेन हजारीका यांनी त्यांचे जवळपास सगळे आयुष्य संगीत क्षेत्रासाठी विशेषतः गाण्यासाठी वेचले. एक पहाडी आवाजाचा गायक अशी त्यांची ख्याती होती. नानाजी देशमुख हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी आयुष्यभर काम केली. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांनी कार्य केले होते. त्यांच्या याच कार्याचा गौरव आता सरकारतर्फे करण्यात आला आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. याआधी नानाजी देशमुख यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊनही गौरवले होते.