पोलीस भरती प्रक्रियेमध्ये राज्य सरकारने नवीन नियम तयार केले आहेत.
भरती प्रक्रियेत तयार करण्यात आलेले नवीन नियम रद्द करुन जुन्याच निकषानुसार परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी पुण्यातील हजारो तरुण-तरुणींनी आज मुठा नदीपात्रातून जिल्हाधीकारी कार्यालयापर्यंत माेर्चा काढला.
पोलीस भरती प्रक्रियेत एकुण 200 गुणांची परीक्षा घेतली जात होती. त्यामध्ये सर्वात आधी 100 गुणांची मैदानी चाचणी घेतली जायची, मैदानी चाचणीमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील अशाच विद्यार्थ्यांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जायची. अशाप्रकारे जे विद्यार्थी 200 गुणांमधून सर्वाधिक गुण मिळवतील अशाच विद्यार्थ्यांची पोलीस म्हणून निवड करण्यात येत होती.
परंतु आता राज्य सरकारने पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बदल केला असून मैदानी चाचणीचे गुण 100 वरुन 50 करण्यात आले आहेत. लेखीपरीक्षा मैदानी चाचणीच्या आधी घेण्यात येणार आहे. राज्य सरकारने पोलीस भरती प्रक्रियेत जे बदल केले आहेत त्या बदल पोलिस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या हजारो तरुण-तरुणींनी विरोध केला आहे. सरकारने जुन्याच निकषांनुसार आधी मैदानी चाचणी घ्यावी व नंतर लेखी परीक्षा घ्यावी अशी मागणी मोर्च्यामध्ये सहभागी झालेले तरुण – तरुणी करत होते.