काँग्रेसला रामराम करत माणिकराव गावितही भाजपच्या वाटेवर?
नंदुरबार: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सर्व राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये तिकिट मिळवण्यासाठी रसीखेच चालू आहे. तिकीट न मिळाल्यामुळे नाराज उमेदवार पक्ष सोडून इतर पक्षात जातात ही गोष्ट तुमच्या आमच्यासाठी काही नवीन राहिलेली नाही.
आपल्या मुलाला लोकसभेचं तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेले नंदुरबारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
भरत गावित चार वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आले, त्यांनी अडीच वर्ष जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं, त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना त्यांच्याकडून अपेक्षा होत्या, मात्र इतकी वर्ष काम करुन देखील काँग्रेसने भरतला डावले, काँग्रेसने घेतलेली ही भूमिका अयोग्य आहे, असे देखील गावित म्हणाले.
३० तारखेला नंदुरबार मध्ये होणाऱ्या मेळाव्यात अपक्ष उभं राहायचं की भाजपला पाठिंबा द्यायचा, यावर निर्णय घेणार असल्याचं माणिकराव गावित यांनी सांगितलं.
माणिकराव गावित व त्यांचे चिरंजीव भरत गावित हे दोघेही लवकरच भाजपचा झेंडा हाती घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील बडं प्रस्थ असलेल्या माणिकराव गावितांच्या बंडामुळे काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो.