अण्णांचे प्राण महत्वाचे, त्यांच्या जीवाशी खेळू नका : उद्धव ठाकरे
मुंबई: अण्णा हजारे ह्यांच्या उपोषणाला शिवसेनेने पाठिंबा दिला असून. उद्धव ठाकरे ह्यांनी त्या संदर्भात एक निवेदन जाहीर केले आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत ह्यांनीहि आपल्या ट्विटर हॅण्डल वर सदर निवेदन पोस्ट केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ह्यांच्या उपोषणाची सरकारने दाखल घ्यावी. अण्णांचे प्राण महत्वाचे आहेत त्यांच्या जीवाशी सरकारने खेळू नये असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी केले आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 3, 2019
पंतप्रधानांनी अण्णांना उपोषणाच्या शुभेच्छा पाठवाव्यात हा प्रकार संतापजनक आणि तितकाच हास्यास्पद आहे असे सांगत ते पुढे म्हणतात “अण्णांचा लढा हा भ्रष्टाचार विरोधी आहे आणि तीच देशाची मूळ समस्या आहे. आमरण उपोषण करून जीव घालवण्यापेक्षा रस्त्यावर उतरून लढा द्यावा व देशाला जाग आणावी. सध्या देशातील जनतेला गुंगीचे औषध देण्यात आले असून जनतेला त्या गुंगीतून बाहेर काढणे गरजेचे आहे. अण्णांनी नव्या क्रांतीसाठी जयप्रकाश नारायण ह्यांची भूमिका स्वीकारावी. गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी हरिद्वारला प्रा. अग्रवाल उपोषणास बसले व त्यांच्या उपोषणाची दखल न घेता त्यांना मरू दिले. देशाची गंगा शुद्ध करण्यासाठी अण्णांनी उपोषण सोडावे व लढा उभारावा. जेथे शक्य आहे तेथे शिवसेना अण्णांना सोबत केल्याशिवाय राहणार नाही” असे शेवटी त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे ह्यांनी सध्याच्या घडीला घेतलेली भूमिका म्हणजे एकूणच येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळणार ह्याची नांदीच म्हणावी अशी आहे.