गव्हाच्या साठ्याची स्थिती १ एप्रिल २०२५ पासून जाहीर करा आणि त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी त्याची माहिती देण्याचे केंद्र सरकारचे संबंधितांना आदेश
नवी दिल्ली/मुंबई, दि. २६: समग्र अन्न सुरक्षेचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि बेकायदेशीर अंदाजांना प्रतिबंध करण्यासाठी भारत सरकारने असा निर्णय घेतला आहे की देशातील सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये व्यवसाय करणारे व्यापारी/घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठ्या साखळीद्वारे व्यवहार करणारे किरकोळ विक्रेते तसेच प्रक्रियादार यांना येत्या १ एप्रिल २०२५ पासून त्यांच्याकडे असलेल्या गव्हाच्या साठ्याची स्थिती https://evegoils.nic.in/wsp/login या पोर्टलवर जाहीर करावी लागेल आणि त्यानंतर पुढील आदेश मिळेपर्यंत प्रत्येक शुक्रवारी गहू साठ्याची माहिती द्यावी लागेल. सदर पोर्टलवर गव्हाच्या साठ्याची माहिती नियमितपणे तसेच योग्य पद्धतीने उघड केली जात आहे याची सुनिश्चिती सर्व संबंधित कायदेशीर संस्थांनी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांतील सर्व प्रकारच्या संस्थांसाठी गहू साठवणीची मर्यादा ३१ मार्च २०२५ रोजी संपत आहे. म्हणून, त्या संस्थांना त्यांच्याकडील गव्हाचा साठा जाहीर करावा लागत आहे. पोर्टलवर अद्याप नोंदणी न केलेल्या कोणत्याही संस्थेला यापुढे स्वतःची नोंदणी करता येईल आणि त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी गहू साठ्याची माहिती पोर्टलवर नोंदवण्याची सुरुवात करता येईल. देशातील गव्हाच्या साठ्याविषयी चुकीचे अंदाज रोखण्यासाठी तसेच किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशात गव्हाची सुलभ उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग गव्हाच्या साठ्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
