विशेष सूचना # घराबाहेर निघताना मास्क वापरा नाहीतर दंड बसेल, वाचा काय म्हणाले आरोग्यमंत्री
मुंबईसह राज्यभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात मास्क वापरणं सक्तीचं असून मास्कशिवाय फिरणं अत्यंत धोक्याचं आहे. यातून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर कायद्याचा वापर करून मास्क न घालणाऱ्यांना दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नसल्याचंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
राज्यात तालुका स्तरावर ‘इंडियन मेडिकल असोशिएशन’च्यावतीनं (आयएमए) ‘रक्षक’ क्लिनिक सुरू करण्यात येणार आहेत. मोठ्या शहरांमध्ये मोबाईल क्लिनिक देखील सुरू करण्याचं आश्वासन ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी दिलंय, या क्लिनिकमध्ये ओपीडी सुरू करण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्य शासनाकडून डॉक्टरांच्या सुरक्षेची आवश्यक ती साधने पुरविण्यात येतील. कोरोनाच्या संकटकाळात सामान्य जनतेला खासगी रुग्णालयातूनही उपचार मिळावेत, अशी अपेक्षा यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११३५ इतका झाला आहे. आज दिवसभरात ११७ रुग्ण आढळले. अशाप्रकारे रुग्णांची संख्या वाढतेय. ही वाढ गुणाकार पद्धतीनं होईल असं वाटत होतं. परंतु, जगातील इतर देशांच्या तुलनेत महाराष्ट्रात अशा पद्धतीनं वाढ झालेली नाही. आता पुढील ७ ते ८ दिवस काळजीचे आहेत. रुग्णांची बेरीज नक्कीच होईल. परंतु, त्या तुलनेत डिस्चार्जही होत आहेत, असेही राजेश टोपे म्हणाले.
मुंबई शहरात धारावी सारख्या भागात हा आजार पसरू नये यासाठी काय व्यवस्था करता येईल, याबाबतचा आढावा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घेतल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. १२ ते १५ लाख लोकसंख्या या भागात राहते. हे लक्षात घेता या भागात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी योग्य त्या सूचना प्रत्येक विभागाला देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या भागात लॉकडाऊन प्रभावीपणे राबवण्याची आवश्यकता असून सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी पोलिसांना कडक भूमिका घेण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले.
राज्यात कोरोनाचा मृत्यूदर ६ टक्क्यावर गेला असून यामध्ये दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आजाराच्या लक्षणांवर प्राथमिक, मध्यम व उच्च अशा तीन विभागात वर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे मुंबई शहरात रुग्णालयांची विभागणी केली असून मृत्यूंचं प्रमाण कमी करणं हा यामागचा उद्देश असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.