शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करत विरोधकांचा सभात्याग
मुंबई, दि. २०: सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहेत आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. गारपीटीने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र पंचनामे करायला कोणी नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदयांनी आदेश काढावेत त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला खडसावले. राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत अजित पवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडला आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, तुम्हाला हक्क व मागण्या मागायच्या आहेत. परंतु माणुसकीची भावना ठेवून पंचनामे करावेत, असे आवाहन पवारांनी संपकऱ्यांना केले.
गारपीटीने ८ शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्यावेळी अधिवेशन सुरू असते त्यावेळी लोकांचे लक्ष असते. शेतकरी अडचणीत आले आहेत आणि सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सत्ताधार्यांकडून सामंजस्याने काम करण्याची आवश्यकता असताना सरकारमधील आमदार संजय गायकवाड यांनी ७५ टक्के कर्मचारी हरामाची कमाई खातात असे वक्तव्य केले. अशा पद्धतीने सर्व कर्मचार्यांना एका रेषेत धरणार तर कामे कशी होणार, असा सवालही अजित पवारांनी केली. राज्यात शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि सरकार दुर्लक्ष करतेय त्यामुळे सभात्याग करत असल्याचे स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.
राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या गंभीर नुकसानाचे राजकारण करण्याची भूमिका विरोधी पक्षाची नाही. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश अशा भागात मोठी गारपीट झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे, ही गंभीर बाब माजी मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत मांडली. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने शेतीचे नुकसान झालेल्या भागात पंचनामे करण्यासाठी यंत्रणा नसेल तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना आजच्या आज सरसकट महसूल मंडळाप्रमाणे एकरी काहीतरी मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली. राज्यात द्राक्ष, आंबा, डाळींब, केळी, कांदा अशा अनेक पीकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संप असल्याने हतबलतेची भूमिका शासनाने घेऊ नये, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.