Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

विकसित भारत संकल्प यात्रेत राज्यपालांच्या हस्ते पालघरमधील लाभार्थ्यांना लाभवाटप

“अंतिम व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचणे हेच योजनेचे खरे यश” – राज्यपाल रमेश बैस

“सर्वांच्या भागिदारीने भारताला विकसित देश बनवण्याचा पंतप्रधानांचा संकल्प वेगाने पूर्ण होईल” – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

मुंबई, दि. २०: विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आज महाशिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच हिरवा झेंडा दाखवून विकसित भारत संकल्प यात्रा रवाना केल्यानंतर देशभरातील विविध भागात संकल्प रथ ठिकठिकाणी जाऊन विविध शासकीय योजनांबद्दल व्यापक जनजागृती करत आहेत. महाराष्ट्रात नंदुरबार , पालघर, नाशिक, गडचिरोली आणि नांदेड या जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा प्रामुख्याने आयोजित करण्यात आली असून हे प्रचार रथ वेगवेगळ्या गावांमध्ये पोहचत असून गावकऱ्यांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

देशाला विकसित बनवण्यासाठी ग्रामीण भागात विकास पोहोचला पाहिजे, अंतिम व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचणे हेच कोणत्याही शासकीय योजनेचे खरे यश आहे, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी आज  विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. याप्रसंगी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार विनोद निकोले, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, कोकण परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक प्रवीण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल रमेश बैस म्हणाले की स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली तरी अजूनही भारत हा एक विकसनशील देश आहे. आपल्या देशाला विकसित बनवण्याचा संकल्प आपण केलेला आहे. केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेचे कौतुक करताना ते पुढे म्हणाले, देशात समानता येण्यासाठी आदिवासी समाजाचा आणि ग्रामीण भागाचा विकास होण्याची आवश्यकता आहे.

या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारने आदिवासी समाजासाठी ज्या विविध योजना आणल्या आहेत, त्याची माहिती सर्वांना देण्यात येत आहे, आपण त्यासाठी पात्र आहोत का याची माहिती सर्वांनी घ्यावी आणि प्रत्येक पात्र व्यक्तीने या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केले.

गेल्या ९ वर्षांत आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकारने अनेक प्रयत्न करून त्यांना विकासाच्या मार्गावर आणले आहे असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यावेळी म्हणाले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी इतर समाजांनीही पुढाकार घेऊन आदिवासी समाजापर्यंत योजना पोहोचवण्याचे प्रयत्न करावेत. सर्वांच्या भागिदारीने भारताला विकसित देश बनवण्याचा पंतप्रधानांचा संकल्प वेगाने पूर्ण होईल, असे कपिल पाटील म्हणाले.

विकसित भारत संकल्प यात्रा आज पालघर जिल्ह्यातील वाडा येथील पालसई गावातही दाखल झाली. यावेळी रथातील प्रतिनिधींनी नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पात्र असलेल्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन नागरिकांना यावेळी करण्यात आले. विकसित भारत संकल्प यात्रे निमित्त पालघर जिल्ह्यातल्या डहाणू मधल्या सेंट मेरी हायस्कूल मध्ये महाशिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं.

सरकारच्या या विशाल संपर्क कार्यक्रमाचा भाग असलेले हे संकल्प रथ म्हणजे विशेष प्रकारे रचना केलेल्या ५ आयईसी(माहिती,शिक्षण आणि संपर्क) व्हॅन आहेत. राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावर प्रमुख योजना, ठळक मुद्दे आणि कामगिरी दर्शवणाऱ्या  हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधील चित्रफिती , माहितीपत्रके, पुस्तिका, पत्रके आणि फ्लॅगशिप स्टँडीच्या माध्यमातून माहितीचा प्रसार  करण्यासाठी या आयईसी व्हॅन्स अर्थात प्रसार रथ सुसज्ज आहेत.

सरकारी योजनांचे लाभ कालबद्ध पद्धतीने सर्व लक्ष्यित लाभार्थींपर्यंत संपूर्णपणे पोहोचत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करणे तसेच कल्याणकारी योजनांचे लाभ मिळवून देणे यावर या यात्रेचा भर आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *