घटना घडून एक महिना उलटूनही अद्याप पोलिसांकडून कोणतीच कारवाई झाली नसल्याचे उघड
उरण, दि. ८(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील जसखार गावातील प्रख्यात कलावंत, महाराष्ट्रभूषण सचिन ठाकूर ह्यांची कार ५ जानेवारी रोजी रात्री राजकीय सूडबुद्धीने जाळण्यात आली. सदर घृणास्पद कृत्य गावातील पुढाऱ्यांच्या गुंडानी, ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवाचा राग मनात धरून केले होते.
सदर घटनेची तक्रार न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. पण ह्या घटनेला एक महिना होऊनदेखील आजपर्यंत गुन्हेगारांचा तपास लागलेला नाही. गावातील काही गावगुंडाना राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये मूळ धरत आहे.
आगरी कोळी समाजातील एक प्रथितयश कलाकार राजकीय सूडचक्रामध्ये विनाकारण भरडला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढे गावात गाड्या जाळण्याचे, घरे फोडण्याचे प्रकार गुंडांकडून घडतील अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती आहे. एवढा मोठा गुन्हा घडून देखील काहीच कारवाई होत नसल्याने गावातील राजकीय पुढारी आणि त्यांचे चेले सोकावले आहेत. आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र भूषण, प्रसिद्ध कलावंत सचिन ठाकूर यांनी केली आहे.