उदगीरमध्ये आज ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप
लातूर, दि.२४: लातूर जिल्ह्यात उदगीर इथं सुरु असलेल्या ९५वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. या संमेलनात काल दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमार मेळावा पार पडला. “संवाद-आजच्या कादंबरीकारांशी”, “प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर येऊन ठेपली आहे”, मराठी साहित्यात निसर्ग चित्रणच आहे, पर्यावरण नाही” या विषयावर परिसंवाद, आणि अन्य कार्यक्रम काल पार पडले.
मुलांच्या मोबाईल वेडाला पालकच जबाबदार असल्याचं मत बालसाहित्यिक आबा महाजन यांनी संमेलनात घेण्यात आलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं. दरम्यान, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचा कार्यकाळ संपल्यामुळे मुंबई साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा उषा तांबे यांनी काल साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
सोळाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनालाही काल उदगिर इथं सुरूवात झाली. गणेश विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या संमेलनात काल विचार फेरी काढण्यात आली. त्यानंतर सनातनवाद आणि लिंगायत वचन साहित्यातील विद्रोह या विषयावर परिसंवाद, आदीवासी नृत्य, महात्मा फुले यांच्या सत्याचा अखंडचे सामुदायिक गायन, संत कबिर यांचे दोहा गायन, पावरी वादन हे कार्यक्रम घेण्यात आले.