Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे महाराष्ट्रातील गावांवर अधिकार सांगू लागले आहेत. ही दिल्लीश्वरांची भूमिका आहे काय?”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला थेट सवाल

मुंबई, दि. २४: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील सीमा भागातील काही भागावर दावा ठोकत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय-सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. या सार्‍या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना(UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा व सोबतील भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांचा समाचार घेतला आहे.

वाचा नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे:

“गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहातोय, महाराष्ट्रात खोके सरकार किंवा मिंधे सरकार आल्यानंतर राज्याची सातत्याने अवहेलना होतेय. आज अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय. जणूकाही महाराष्ट्रात माणसं राहातच नाहीत. महाराष्ट्राला स्वाभिमान, अस्मिता, हिंमत काहीच नाहीये. कुणीही यावं, टपलीत मारावं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून गप्प बसावं, हे आता खूप झालं. महाराष्ट्र शिवाजी महाराजांना मानतोच हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांचा अपमान झाल्यानंतर गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. ज्यांनी महाराजांचा अपमान केला, त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दिल्या जात आहेत”

“महाराष्ट्रातल्या गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा सांगत आहेत. आज महाराष्ट्रात ईडी सरकार किंवा खोके सरकार किंवा मिंधे सरकार आहे. या सरकारला मुख्यमंत्री आहेत की नाही कळतच नाही. कारण मुख्यमंत्री काही बोलतच नाहीत. त्यांना काही विचारलं तर ते सांगतील ‘काळजी करू नका. मी पंतप्रधानांना सांगितलं आहे. ते म्हणाले की त्यांनी ४० गावं घेतली तर घेऊ द्या. आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यानंतर महाराष्ट्राला १०० गावं देऊ’ असंही ते कदाचित सांगू शकतील. त्यांच्याकडून काही अपेक्षा नाहीच आहे. उपमुख्यमंत्री नेहमीप्रमाणे सारवासारव करत आहेत”

“पक्षाचे नेते किंवा राज्याचे मुख्यमंत्री, विशेषत: भाजपाच्या आखत्यारीतले, त्यांच्या वरीष्ठांच्या मर्जीशिवाय काही बोलू-चालू शकतात का? ते नसेल, तर मग बोम्मई जे काही बोललेत, हे त्यांच्या वरीष्ठांच्या परवानगीशिवाय बोलले आहेत का? म्हणजे भाजपाचा महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न, उद्योगधंदे इतरत्र पळवून महाराष्ट्र कंगाल करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे”

“असा प्रघात आहे, की ज्याचं सरकार केंद्रात असतं, त्यांच्याच विचारांची माणसं सगळ्या राज्यांत राज्यपाल म्हणून पाठवली जातात. या माणसांची कुवत, पात्रता काय असते? ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? हा प्रश्न केंद्राला विचारायला हवा. राज्यपाल नियुक्तीचेही निकष ठरवायला हवेत, असं माझं ठाम मत आहे. राज्यपाल राष्ट्रपतींचे दूत असतात. राष्ट्रपती नि:पक्ष असायला हवेत, तसेच राज्यपालही असायला हवेत. मात्र, राज्यपाल जे काही बोलतात, ते गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. आपल्या राज्यपालांना राज्यपाल म्हणणं मी सोडून दिलं आहे. राज्यपाल पदाचा मी मान करत आलो आहे, यापुढेही करेन. पण राज्यपालपदाची झूल कुणी पांघरली, म्हणजे त्यांनी वेडंवाकडं काहीही बोलावं हे मी आणि महाराष्ट्र मान्य करेल असं मला वाटत नाही”

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *