राज्याच्या प्रत्येक महाविद्यालयात आजपासून सकाळी राष्ट्रगीताने सुरुवात – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त आदरांजली
मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक इंजिनिअरिंग, फार्मसी, डिफार्म, आर्किटेक्ट महाविद्यालयामध्ये आता सकाळी राष्ट्रगीताने सुरूवात होणार आहे. हा निर्णय महात्मा गांधींच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आजपासून करण्यात येत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागातील 20 लाख विद्यार्थी ‘जन गण मन’ म्हणणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य असणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंत्रालयाशेजारील उद्यान त्यांच्या पुतळ्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुष्पहार अर्पण करुन आदराजंली वाहिली.
मंत्री सामंत म्हणाले की, राज्यातील महाविद्यालयाच्या 38 लाख विद्यार्थ्यांना आता राष्ट्रगीत म्हणावे लागणार असून या माध्यमातून देशभक्तीची भावना रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आज महात्मा गांधी यांची आठवण काढण्याचा दिवस असून त्यांना आदरांजली, श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस आहे. भविष्यामध्ये महात्मा गांधी यांचे अहिंसेचे विचार लोकांमध्ये रुजवण्यासाठी आपण जी भावी पिढी तयार करत आहात त्याबद्दल सामंत यांनी महात्मा गांधी स्मारक समितीचे अभिनंदन केले .
या कार्यक्रमास महात्मा गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष देवराज सिंग, सचिव सुमंत पवार, खजिनदार संतोष भोईर, लायन्स क्लबचे डॉ. आचार्य, नगरसेवक राजेंद्र नरवनकर, विविध समाजातील धर्मगुरू तसेच कुलाबा म्युनिसिपल शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विविध समाजातील धर्मगुरू यांनी आपल्या मातृभाषेतून सर्वधर्म प्रार्थना सादर केली. आदरांजली वाहिल्यानंतर महात्मा गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष देवराज सिंग यांनी मंत्री सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.