तुळापूर येथील राज्याभिषेक सोहळ्यात खासदार संभाजीराजे म्हणाले, “आमच्या शिवभक्तीवर प्रश्न उपस्थित केले गेले”
तुळापूर: आज तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या ३४०व्या राज्याभिषेक दिनानिमित्त खासदार छ. युवराज संभाजीराजे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी सध्या महाराष्ट्राल्या वातावरणावर आपलं मनोगत व्यक्त केलं.
“महाराजांच्या बलिदानंतर हिंदवी स्वराज्याची धुरा, राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी साहेबांनी सांभाळली. त्याही पुढे अनेक मराठा सरदारांनी तो वसा चालवला. मराठ्यांनी आपला स्वाभिमान कधीही सोडला नाही. औरंगजेब ला सुद्धा याच मातीत आपण गाढलं हा इतिहास इथून संपूर्ण देशात गेला पाहिजे. छत्रपती शिवरायांची महती ऐकून विदेशी असणारे पीटर व्हँन गेट गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्राचे दुर्गवैभव पाहण्यासाठी,अभ्यास करण्यासाठी फिरत आहे त्याच कौतूक करावं तितक कमी आहे.
ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करत असताना अनेक वेळा स्वतःचा जीव धोक्यात घातला. संभाजी महाराजांनी तर स्वराज्यासाठी बलिदान दिलं. आमच्या घराण्यात शिकवणच आहे की, स्वतःच्या पेक्षा रयत महत्वाची अगदी त्याच विचाराने मी कोल्हापूर-सांगली महापुरात माझा स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवायला गेलो. याची दखल वाद करणाऱ्यांनी घेतली नाही. मी अनेक वर्ष शिवरायांचे गडकिल्ले जतन करण्यासाठी धडपडतोय याची दखल घेतली नाही. मराठा आरक्षणासाठी यशस्वी लढा अनेक वर्षांपासून देतोय, याचं कौतुक करावं वाटलं नाही. पण त्या नरेंद्र मोदींची तुलना केलेल्या वादग्रस्त पुस्तकाचा महाराष्ट्रात सर्वात आधी निषेध केलेला असताना सुद्धा, आमच्या शिवभक्तीवर प्रश्न उपस्थित केले गेले.
आणि दोन दिवसांपासून ज्या प्रकारचं राजकारण केलं जातं आहे, ते पाहून मी उद्विग्न झालो आहे. मी स्वतःचा फोन बंद करून ठेवला होता. मला प्रश्न पडला की, हाच पुरोगामी महाराष्ट्र आहे का? शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर, संत तुकाराम महाराज, तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, आपल्याला अश्याप्रकारचे राजकारण शोभा देत नाही. पातळी इतकीही घसरू देऊ नका, जेणेकरून सर्वसामान्य लोक दुखावतील.”