तारक मेहता का उलटा चष्मा च्या निर्मात्याची माफी पण मराठी माणूस बहिष्कारावर ठाम
मुंबई: “तारक मेहता का उलटा चष्मा” या टीव्ही मालिकेच्या निर्मात्यांनी अखेर समस्त मराठी जनांची माफी मागितली आहे. तारक मेहता या मालिकेच्या एका भागामध्ये त्यातील एक पात्र मुंबईची भाषा हिंदी असल्याचे म्हणाले होते. याची व्हिडिओ क्लिप दिवसभर फिरत होती. सोशल मीडियावर तर संतापाची लाट पसरली होती. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही याबाबत तीव्र प्रतिक्रिया नोंदवली होती.
या नंतर या मालिकेच्या निर्माते असित कुमार मोदी यांनी मालिकेत तारक मेहता ची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांच्याकरवी मराठी माणसाची माफी मागितली. यावेळी ते म्हणाले की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याकारणाने सर्व प्रांतातील लोकांना सामावून घेते त्याअर्थी मुंबईची भाषा मराठी असल्याचे म्हणत त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर चूक झाल्याचे भाव अभावानेच होते असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. या मालिकेचे निर्माते यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका भागात पाचारण करत निवडणुकीत अप्रत्यक्ष फायदा करवून दिला होता. आता भलेही निर्मात्यांनी माफी मागितली असली तरी मराठीजनांनी या मालिकेवर बहिष्कार टाकण्यासाठी मोहीम सुरू केल्याचे दिसते.
— Asit Kumarr Modi (@AsitKumarrModi) March 3, 2020