सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेटर श्रीसंतवरील आजीवन बंदी उठविली
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आरोप सिद्ध झाल्यानंतर BCCI ने आजीवन क्रिकेटबंदी घातलेला भारताचा माजी गोलंदाज एस. श्रीसंत याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. श्रीसंतवरील आजीवन बंदी न्यायालयानं उठवली आहे. श्रीसंतवरील आजीवन बंदीच्या शिक्षेबाबत BCCI ने पुनर्विचार करावा आणि ३ महिन्यांच्या आत याबाबतचा निकाल द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. २०१३ साली झालेल्या आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप श्रीसंतवर झाला होता. त्यानंतर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीनं त्याच्यावर बंदीची कारवाई केली होती. या कारवाईला श्रीसंतने आधी केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र, केरळ उच्च न्यायालयानं बीसीसीआयचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर श्रीसंतनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथे त्याला आज दिलासा मिळाला.
“सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे माझ्यासाठी एक लाईफलाईन आहे. या निर्णयामुळे मला माझा सन्मान परत मिळवण्यासाठी मदत होईल. ३ महिन्यांच्या कालावधीत माझ्यावरील बंदी हटवण्याच्या निर्णयावर विचार होईल. पण तोपर्यंत न थांबता मी आतापासूनच क्रिकेटचा सराव करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच मी तुम्हा सगळ्यांना क्रिकेटच्या मैदानात पुन्हा दिसेन” असा विश्वास श्रीसंतने व्यक्त केला आहे.