उन्हाळा सुरु होताच राज्यात वीज दर कडाडणार
ऐन उन्हाळ्यात राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने दिलेल्या वीजदरवाढ आदेशानुसार राज्याला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणचे वीजदर आता १ एप्रिल २०१९ पासून पुन्हा वाढणार आहेत.
घरगुती वीजग्राहकांना सरासरी सहा टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये राज्य वीज नियामक आयोगानं याबद्दलचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात येईल. राज्य वीज आयोगानं गेल्या वर्षी १२ सप्टेंबरला राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या नव्या वीजदरांना मान्यता दिली होती. त्यानुसार महावितरण, अदानी, टाटा पॉवर यांचे वीजदर वाढले. महावितरणला ८२६८ कोटी रुपयांची दरवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे १ एप्रिल २०१९ पासून नव्या आर्थिक वर्षांतही पुन्हा या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे.
दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांकडून महावितरण ५.३० रुपये प्रति युनिट इतका दर आकारतं. आता त्यामध्ये १६ पैशांची भर पडेल. त्यामुळे एका युनिटसाठी ५.४६ रुपये मोजावे लागतील. तर १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिटमागे २४ पैसे जास्त मोजावे लागतील. ५०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांची वीज १५ पैशांनी महाग होणार आहे. वीजदरांसोबतच स्थिर आकारातही १० रुपयांची वाढ होणार आहे. तो ८० रुपयांवरून ९० रुपये होणार आहे. महावितरणची १२ हजार ३८२ कोटी रुपयांची दरवाढ तूर्तास लांबणीवर टाकण्यात आली आहे. ती विधानसभा निवडणुका संपल्यानंतर कधीही लागू होऊ शकते. त्यामुळे येत्या काही महिन्यात राज्यातील जनतेला दरवाढीचे आणखी शॉक बसण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही वीजदरवाढ होत असल्याने आता राजकारणात त्यावरून वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.