१४० दिवसांच्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांकडून १०६ लाख टन साखरेचे उत्पादन
पुणे: राज्यातील उसाचा चालू गाळप हंगाम संपला असून या हंगामात एकंदर दहाशे बारा लाख टन उसाचं गाळप होऊन अंदाजे एकशे सहा लाख टन साखरेचं उत्पादन झाल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. सुमारे १४० दिवस चाललेल्या यंदाच्या हंगामात सरासरी साडेदहा टक्के साखर उतारा मिळाल्याचंही ते म्हणाले. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही राज्यभरातील एकंदर एकशे नव्वद साखर कारखान्यांनी गाळप केलं.
दरम्यान देशभरातल्या साखर कारखान्यांनी चालू गाळप हंगामात सुमारे ३१८ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याबद्दलचे करार विविध तेल कंपन्यांशी केल्याचं साखर उद्योगातील सूत्रांनी काल सांगितलं. यंदा टाळेबंदी मुळे पेट्रोलचा खप तुलनेत कमी झाला. त्यामुळं इंधनात मिश्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या इथेनॉलची मागणी कमी झाली. तरी सुद्धा कारखान्यांनी एवढे विक्री करार केल्यानं समाधान व्यक्त होत आहे.