ऑनलाईन आंतरराष्ट्रीय रेफ्री वर्कशॉपमध्ये एकमेव भारतीय सुभाष पाटील यांचा सहभाग
पनवेल : वर्ल्ड तायक्वान्डो आणि युरोप तायक्वान्डो युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने १८ मे ते २२ मे २०२० दरम्यान ५ दिवसांचे रेफ्री (पंच) वर्कशॉप घेण्यात आले होते. या ऑनलाईन सेमिनारमध्ये जगातील शंभरच्यावर आंतरराष्ट्रीय पंच सहभागी झाले होते. या सेमिनारमध्ये आपल्या भारतातील एकमेव सुभाष पाटील यांनी भाग घेतला होता. कोरोना विषाणू प्रादुर्भाव संकटामुळे क्रीडा क्षेत्रातही मोठे संकट आले आहे पण या संकटाला न घाबरता तायक्वान्डो खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देण्याचे कार्य सुभाष पाटील करत आहेत व ते स्वतःही वेळोवेळी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण घेत स्वतःला अद्यावत ठेवत आहेत.
येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी, नवीन नियमांची त्यांना माहिती मिळावी म्हणून भारतातून एकमेव आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील यांनी सहभाग नोंदवला होता. या सेमिनारमध्ये चकीर अल्बर्ट (स्वीडन), उस्मान दिदार (ब्रिटिश तायक्वान्डो) यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. येणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये जे नियम आहेत त्याची यावेळी त्यांनी माहिती दिली. सुभाष पाटील हे महाराष्ट्रामध्ये एकमेव प्रथम श्रेणीचे आंतरराष्ट्रीय पंच आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कळंबोली गावचे ते सुपुत्र आहेत.