मुंबईतील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांनी केली घोषणा
शिवसेना-वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांची बहुप्रतीक्षित अशी युती आज दि. २३ जानेवारी रोजी अखेर जाहीर झाली. शिवसेना(यूबीटी) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडी चे प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आज याची घोषणा करण्यता आली. या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाचे सुभाष देसाई, संजय राऊत, अरविंद सावंत तर वंचित बहुजन आघाडीकडून रेखाताई ठाकूर, अबुल खान उपस्थित होते. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी शिवशक्ती-भिमशक्ती ची घोषणा झाल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय क्षितिजावर वेगळ्या घडमोडी येत्या काळात पाहायला मिळू शकतात.
या प्रसंगी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म दिवस आहे. प्रकाश आंबेडकर आणि आम्ही पुढची वाटचाल एकत्र घेऊन जाण्यासाठी एकत्र आलो आहोत. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा हे स्नेही होते. दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि जीवाला जीव देणारे सहकारी एकत्र येऊन ‘देश प्रथम’ याचा विचार करुन पुढे जाणार आहोत. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र येत आहोत. पुढील राजकीय वाटचाल कशी असेल याच्याबद्दल आम्ही नंतर वेळेनुसार निर्णय घेऊच,” अशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
“आम्हाला जेव्हा वाटलं फसवणुकीचा राजकारण होतंय तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससोबत गेलो आणि मविआ सरकार यशस्वीपणे चालवलं. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा झाली, तुम्हाला सोबत घ्यायला कोणाची ना नाही. आमचं असं ठरलं की काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी आपल्या मित्रपक्षाला आणायचं आणि मित्रपक्षांसोबत हित सांभाळायचं,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
नरेंद्र मोदी यांचा सुद्धा एक दिवस अंत पक्षात होणार आहे
वंचित चे प्रकाश आंबेडकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “निवडणुकीमध्ये एक बदल्याचं राजकारण सुरु होईल. आम्ही जी चळवळ सुरु केली. त्याला आमच्याच मित्र पक्षांनी गिळंकृत करण्याचा किंवा छोटा करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना बाजूला करुन चळवळ सुरु ठेवली. भांडवलशाही, लुटारुंची सत्ता सुरु झाली आहे. दावोसला जाऊन उद्योग येतात हे मी कधी पाहिलं नाही, फक्त करार होतात. आज ईडीच्या मार्फत पॉलिटिकल लीडरशिपवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. नरेंद्र मोदी यांचा सुद्धा एक दिवस अंत पक्षात होणार आहे, त्यांनी त्यांच्या पक्षातील लीडरशिप संपवली आहे. फक्त फाईली उचलून घेऊन जायचं आमचं काम आहे, असं त्यांच्यातले अनेक मंत्री म्हणतात. प्रादेशिक पक्षांचा लीडरशिप तयार करण्याचा प्रयत्न असेल तर त्याला आमचा पाठिंबा असेल.”