हिंदुत्वाचा समान दुवा असल्यामुळे शिवसेना भाजपची युती झाली : चंद्रकांत पाटील
सुरुवातीच्या काळात भाजप आणि शिवसेनेमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद होते. पण आमच्या दोघांमध्येही हिंदुत्वाचा समान दुवा असल्यामुळे आम्ही पुन्हा युती केली, असे भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच आमचे सर्व मुद्दे उद्धव ठाकरे यांना पटवून देण्यात आम्ही यशस्वी झालो, त्यांना ते मुद्दे पटले आणि त्यांचे गैरसमज दूर झाले आहेत. त्यामुळेच शिवसेना व भाजपची युती झाली. युती तुटली नव्हती आणि भविष्यात कधीही तुटणार नाही. शिवसेना आणि भाजपाचे रक्त एकच आहे. भाजप- शिवसेना एकमेकांचे भाऊ आहेत. दोन भावांमध्ये कितीही मतभेद किंवा वाद झाले तरीही ते शेवटी एकत्र येतात. दोन भाऊ जेव्हा मोठे होऊन एकाच गोष्टीसाठी आग्रह करतात तेव्हा त्यांच्यामध्ये एकमत होण्यास वेळ लागतो. त्यामुळेच दोन्ही पक्षांमध्ये युती व्हायला थोडा वेळ लागला. असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी विरोधकांवर टीका करताना पाटील म्हणाले की, शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये असलेल्या वादामुळे राज्यातील सर्व सामान्य माणूस दुःखी झाला होता. परंतु विरोधी पक्षातले नेते मात्र प्रचंड खुश झाले होते. विरोधी पक्षातील नेते किती जरी खुश झाले तरी त्यांना जे हवे आहे, ते आम्ही होऊ देणार नाही.
जागा वाटपांबाबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील. विधानसभा निवडणुकीला बराच वेळ आहे. लोकसभेतील निकालानंतर अनेक समीकरणे बदलतील. त्यामुळे त्यावर आताच मत व्यक्त करणे योग्य नाही.असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.