“मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत” खासदार संभाजीराजे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
कोल्हापूर: राज्यसभा खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण आंदोलन वरील विरोध गुन्हे तात्काळ मागे घेण्यासाठी तसेच कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठास सहित महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक स्थळी एकेरी शिवरायांचे एकेरी नाव असलेल्या ठिकाणी “छत्रपती शिवाजी” महाराज असे करण्याची मागणी नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
या पत्राची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाने करत म्हटले आहे की, “सर्वप्रथम मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल आपले अभिनंदन. माझे हे आपल्या नावे पहिलेच पत्र आहे. महाराष्ट्रातील जनमानसात छत्रपती शिवाजी महाराजांचे किती मोठे स्थान आहे हे आपणास माहीतच आहे. काही दिवसांपासून महाराजांच्या नाम उच्चारावरून मोठी चर्चा होत आहे. मग ते अमिताभ बच्चन प्रकरण असो की केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचं. त्या दोन्ही वेळी शिवभक्तांची बाजू घेत जाब विचारला होता. यावर कायमस्वरूपी उपाय योजना करणे आवश्यक आहे. सुरुवात म्हणून आपण सर्व सार्वजनिक स्थळांचे नाम विस्तार करणे आवश्यक आहे, ज्यांचे नाव केवळ शिवाजी असे आहे. आपणास अजून एक विशेष विनंती की मराठा आरक्षणा करिता महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरून लढली त्याचा अनेक ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक आंदोलकांवर विनाकारण गुन्हे नोंदवले गेले आहेत. मी माजी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत पत्र लिहून चर्चा केली होती. आपणास ही विनंती की आपण उत्तर उपरोक्त विषयांवर तात्काळ निर्णय घेऊन आदेश निर्गमित करावेत.”