‘सागर की पुकार’ या सागरी प्रदर्शनाचे मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावर उद्घाटन
मुंबई, दि. ६: ‘सागर की पुकार’ या प्रदर्शनाचे उद्घाटन मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (एडीआरएम) आयआरटीएस शशी भूषण यांच्या हस्ते ४ एप्रिल २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे झाले. ३० मार्च २०२४ ते ०५ एप्रिल २०२४ या कालावधीत साजरा करण्यात आलेल्या राष्ट्रीय सागरी सप्ताह समारंभाचा एक भाग म्हणून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय सागरी दिन उत्सव समितीने याचे आयोजन केले.
शिपिंग महासंचालक आणि राष्ट्रीय सागरी दिवस महोत्सव (एनएमडीसी) (केंद्रीय) समितीचे अध्यक्ष आयएएस श्याम जगन्नाथन, भारतीय शिपिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि एनएमडीसी (केंद्रीय) समितीचे उपाध्यक्ष कॅप्टन बी.के. त्यागी यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
आपल्या भाषणात भूषण यांनी पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याच्या चौकटीत मल्टीमोडल वाहतुकीची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली प्रभावी लॉजिस्टिकसाठी रस्ते, जलमार्ग आणि हवाई मार्ग यांच्या सुसंवादी एकत्रीकरणावर त्यांनी भर दिला.
जगन्नाथन यांनी राष्ट्रीय सागरी दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. ‘एसएस लॉयल्टी’ या जहाजाने ५ एप्रिल रोजी लंडनच्या दिशेने सुरु केलेल्या पहिल्या प्रवासानिमित्त भारताच्या सागरी वारशाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. एनएमडीसी च्या आयोजन समितीचे अध्यक्ष आणि भारतीय शिपिंग कॉर्पोरेशनचे संचालक अतुल उबाळे, शिपिंगचे उपमहासंचालक आणि एनएमडीसी (मध्य) समितीचे सदस्य सचिव डॉ. पांडुरंग राऊत आणि दर्यावर्दी रोजगार कार्यालयाचे संचालक राजेश एच मेंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे प्रदर्शन यशस्वी राहण्यासाठी कार्य केले.