आनंदी गोपाळ सामाजिक विषयांवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट
नवी दिल्ली, दि.२५: भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार आज ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली इथं आयोजित ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी रजनीकांत यांना हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रियदर्शन दिग्दर्शित ‘मरक्कर अरबीक्कडिलिंटे सिंहम’ या मल्याळम चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार ‘बहत्तर हूरिया’ या हिंदी चित्रपटासाठी संजय पूरणसिंग चौहान यांना, तर उत्कृष्ट अभिनेता म्हणून ‘भोसले’ या चित्रपटासाठी मनोज वाजपेयी तसंच ‘असूरन’ या तामिळ चित्रपटातल्या भूमिकेसाठी अभिनेता धनुष यांना मिळाला. उत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा पुरस्कार ‘मनकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी कंगना रनौतला मिळाला.
चित्रपटांसाठी सर्वात अनुकूल राज्याचा पुरस्कार सिक्कीमला मिळाला.
मराठीतला आनंदी-गोपाळ हा सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट तर ‘ताज महाल’ हा राष्ट्रीय एकात्मतेवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. ‘बार्डो’ चित्रपटातल्या गाण्यांसाठी सावनी रवींद्रने सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार पटकावला.
लता भगवान करे आणि पिकासो या मराठी चित्रपटांचा विशेष गौरवपूर्ण उल्लेख पुरस्कारांमधे समावेश झाला आहे. सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रण पुरस्कार त्रिज्या या मराठी चित्रपटाकरता मंदार कमळापूरकर यांना मिळाला तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरलेल्या कस्तुरीचे दिग्दर्शक विनोद कांबळे यांनीही पुरस्कार स्वीकारला.
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार द ताश्कंद फाइल्स चित्रपटासाठी पल्लवी जोशी यांना देण्यात आला. चित्रपट विषयक लेखन श्रेणीत “सिनेमा पाहणारा माणूस या मराठी पुस्तकासाठी लेखक अशोक राणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तर फिल्मस डिवीजनची निर्मिती असलेल्या “Elephants Do Remember” चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपट श्रेणीत गौरविण्यात आलं.
विविधतेतून एकता हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असून ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम भारतीय चित्रपट सृष्टीने चोख बजावलं असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केलं आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं नवी दिल्ली इथं वितरण केल्यानंतर ते बोलत होते. चित्रपट अत्यंत शक्तिशाली माध्यम असून त्याचा मानवतेसाठी सकारात्मक वापर करावा असं आवाहन त्यांनी चित्रपटसृष्टीतल्या मान्यवरांना केलं.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर कार्यक्रमाला उपस्थित होते. चित्रपट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं ते आपल्या भाषणात म्हणाले.