Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान; ‘या’ मराठी चित्रपटांनाही मिळाले राष्ट्रीय पुरस्कार

आनंदी गोपाळ सामाजिक विषयांवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट

नवी दिल्ली, दि.२५: भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार आज ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली इथं आयोजित ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी रजनीकांत यांना हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रियदर्शन दिग्दर्शित ‘मरक्कर अरबीक्कडिलिंटे सिंहम’ या मल्याळम चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार ‘बहत्तर हूरिया’ या हिंदी चित्रपटासाठी संजय पूरणसिंग चौहान यांना, तर उत्कृष्ट अभिनेता म्हणून ‘भोसले’ या चित्रपटासाठी मनोज वाजपेयी तसंच ‘असूरन’ या तामिळ चित्रपटातल्या भूमिकेसाठी अभिनेता धनुष यांना मिळाला. उत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा पुरस्कार ‘मनकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी कंगना रनौतला मिळाला.

इतर पुरस्कार या प्रमाणे :
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजय सेतूपती, चित्रपट-सुपर डिलर्स
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री -पल्लवी जोशी, चित्रपट-द ताश्कंद फाईल्स
उत्कृष्ट पार्श्वगायन पुरुष – बी. प्राक, चित्रपट-केसरी, गीत-तेरी मिट्टी
उत्कृष्ट पार्श्वगायन स्त्री – सावनी रविंद्र, चित्रपट-बार्डो, गीत-रान पेटलं
उत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – डी. इमान, चित्रपट – विश्वासम
उत्कृष्ट पार्श्वसंगीत – प्रबुद्ध बॅनर्जी, चित्रपट-ज्येष्ठपुत्रो
उत्कृष्ट गीत – प्रभा वर्मा, चित्रपट – कोलांबी
उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – राजू सुंदरम , चित्रपट – महर्षि
सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट-आनंदी गोपाळ, दिग्दर्शक-समीर विद्वांस
राष्ट्रीय एकात्मतेवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा नर्गिसदत्त पुरस्कार नियाज मुजावर दिग्दर्शित – ताजमहाल या चित्रपटाला मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपट – एन इंजिनियर ड्रीम, दिग्दर्शक हेमंत गाबा
उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शन –  सोहिनी चटोपाध्याय,
कथाबाह्य चित्रपटांमधे सर्वोत्कृष्ट सचेतपट – राधा
चित्रपटावरच्या उत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार संजय सुरी लिखित अ ‘गांधीयन अफेयर -इंडियाज क्युरियस पोर्ट्रेअल ऑफ लव्ह इन सिनेमा’

चित्रपटांसाठी सर्वात अनुकूल राज्याचा पुरस्कार सिक्कीमला मिळाला.

मराठीतला आनंदी-गोपाळ हा सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट तर ‘ताज महाल’ हा राष्ट्रीय एकात्मतेवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. ‘बार्डो’ चित्रपटातल्या गाण्यांसाठी सावनी रवींद्रने सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार पटकावला.

लता भगवान करे आणि पिकासो या मराठी चित्रपटांचा विशेष गौरवपूर्ण उल्लेख पुरस्कारांमधे समावेश झाला आहे. सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रण पुरस्कार त्रिज्या या मराठी चित्रपटाकरता मंदार कमळापूरकर यांना मिळाला तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरलेल्या कस्तुरीचे दिग्दर्शक विनोद कांबळे यांनीही पुरस्कार स्वीकारला.

उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार द ताश्कंद फाइल्स चित्रपटासाठी पल्लवी जोशी यांना देण्यात आला. चित्रपट विषयक लेखन श्रेणीत “सिनेमा पाहणारा माणूस या मराठी पुस्तकासाठी लेखक अशोक राणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तर फिल्मस डिवीजनची निर्मिती असलेल्या “Elephants Do Remember” चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपट श्रेणीत गौरविण्यात आलं.

विविधतेतून एकता हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असून ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम भारतीय चित्रपट सृष्टीने चोख बजावलं असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केलं आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं नवी दिल्ली इथं वितरण केल्यानंतर ते बोलत होते. चित्रपट अत्यंत शक्तिशाली माध्यम असून त्याचा मानवतेसाठी सकारात्मक वापर करावा असं आवाहन त्यांनी चित्रपटसृष्टीतल्या मान्यवरांना केलं.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर कार्यक्रमाला उपस्थित होते. चित्रपट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं ते आपल्या भाषणात म्हणाले.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *