राज ठाकरे म्हणाले, “हा सर्वसाधारण झेंडा नाही ह्यावर महाराजांची राजमुद्रा आहे त्यामुळे….”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गोरेगाव येथे महाधिवेशन होते. या अधिवेशनात थोड्याच वेळापूर्वी राज ठाकरे यांनी उपस्थित मनसैनिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पक्षाची पुढची दिशा आणि भूमिका स्पष्ट केली.
आज आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी झेंड्याच्या बदलेल्या रुपाबद्दल भाष्य करताना सांगितले की, “पक्षाच्या स्थापनेच्या वेळेस माझ्या मनात जो झेंडा होता तो झेंडा हाच आहे, ज्या झेंड्याचं अनावरण झालं. संयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा पण भगवा होता. पण स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं. ह्या पेक्षा काय वेगळं सोशल इंजिनिअरिंग असणार आहे?
पुढे ते म्हणाले की, “हा झेंडा आणावा हे माझ्या मनात गेले एक वर्ष घोळत होतं आणि माझा मूळचा डीएनए हाच आहे जो ह्या झेंड्याचा रंगाचा आहे. मग ठरवलं अधिवेशनाच्या निमित्ताने हा झेंडा समोर आणायचा. हा सर्वसाधारण झेंडा नाही ह्यावर महाराजांची राजमुद्रा आहे त्यामुळे त्याचा सन्मान राखणं ही आपली जबाबदारी आहे. निवडणुकीच्या वेळेस राजमुद्रेचा झेंडा वापरायचा नाही, त्याचा आब राखला गेलाच पाहिजे.”
झेंडा बदलणं ही काही नवीन गोष्ट नाही, ह्या आधी जनसंघाने देखील झेंडा आणि नाव बदललंच आहे. १९८० साली जनसंघाचं नाव भारतीय जनता पक्ष झालंच होतं असं म्हणत त्यांनी पक्षाचा झेंडा बदलणं हे वावगं नसल्याचं म्हटलं.