मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नमुमपा तर्फे करण्यात आलेल्या कारवाईत २४४ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त आणि ५० हजार दंड वसूल
नवी मुंबई, दि. ८: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याप्रमाणेच पर्यावरणाला हानीकारक असणा-या प्लास्टिक प्रतिबंधाकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीत दिले आहेत. या अनुषंगाने एकल वापर होणा-या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबावा याकरिता जनजागृती करण्यासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक शोध मोहीमा सर्वच विभागांमध्ये राबविल्या जात आहेत.
यामध्ये परिमंडळ २ च्या प्लास्टिक विरोधी विशेष भरारी पथकाने उपआयुक्त चंद्रकांत तायडे यांच्या नियंत्रणाखाली ऐरोली सेक्टर ८ ए येथे प्रतिबंधात्मक प्लास्टिक वितरण करणा-या एका टेम्पोवर धाड टाकत साधारणत: २२५ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त केला तसेच संबंधितांकडून ५ हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. या कारवाईत डी.आर.पाटील, वसंत बाविस्कर, महेश पाटील, अनिकेत म्हात्रे या महापालिका कर्मचा-यांनी चांगले काम केले.
अशाच प्रकारे १ मे पासून आठवड्याभरात बेलापूर विभागात ३ व्यावसायिक/आस्थापनांवर कारवाई करीत १५ हजार दंडात्मक रक्कम व १० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. वाशी विभागात एका व्यावसायिकावर कारवाई करीत ५ हजार दंडात्मक रक्कम व १ किलो एकल वापर प्लास्टिकची जप्ती केली. कोपरखैरणे विभागातही एका दुकानदाराकडून ५ हजार दंड वसूली व दीड किलो प्लास्टिक जप्ती करण्यात आली. परिमंडळ १ च्या प्लास्टिकविरोधी भरारी पथकाने एका व्यावसायिकावरील कारवाईत ५ हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि १ किलो एकल वापर प्लास्टिकचा साठा जप्त केला. तसेच परिमंडळ २ च्या भरारी पथकाने ४ व्यावसायिकांवर कारवाई करीत २० हजार दंड वसूली आणि २३० किलो ६०० ग्रॅम इतके प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले आहे. अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आठवड्याभरात १० दुकाने/आस्थापना यांच्याकडून ५० हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूली तसेच २४४ किलो १०० ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे.
यापुढील काळातही नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ही प्लास्टिक वापर प्रतिबंधात्मक कारवाई अशीच सुरू राहणार असून नागरिकांनीही कापडी पिशव्यांच्या वापर सुरू करून आपल्या रोजच्या जगण्यातून पर्यावरणाला व मानवी जीवनाला धोका पोहचविणा-या एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा असे आवाहन करण्यात येत आहे.