गुणवंत विद्यार्थी घडविणा-या नवी मुंबई महानगरपालिका शिक्षकांचा सुप्रसिध्द साहित्यिक, कवी प्रा. अशोक बागवे यांच्या उपस्थितीत गौरव
नवी मुंबई, दि. १६: नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी मोठया प्रमाणात शिष्यवृत्ती संपादन करीत आहेत. दहावीसह सर्वच परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवित आहेत. विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके संपादन करीत आहेत, तसेच कला व क्रीडा क्षेत्रातही चांगले प्रदर्शन करीत आहेत. यामध्ये महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा महत्वाचा वाटा असून असे गुणवंत विद्यार्थी घडविणा-या शिक्षकांचा गौरव करणे हे त्यांना प्रोत्साहन देणारे असल्याचे मत बेलापूर विधानसभा सदस्य आ. मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांमधील मोबाईलचा अतिवापर टाळून त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी रूजविली पाहिजे असे त्या म्हणाल्या. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित शिक्षक गुणगौरव समारंभप्रसंगी त्यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षण अधिकारी अरुणा यादव तसेच विशेष व्याख्याते म्हणून सुप्रसिध्द साहित्यिक, कवी प्रा. अशोक बागवे उपस्थित होते.
याप्रसंगी शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ अभियानात राज्यात व्दितीय क्रमांक संपादन करणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पीएमश्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज नमुंमपा शाळा क्रमांक ५५, कातकरी पाडा तसेच खाजगी शाळांमध्ये ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक संपादन करणा-या पीएमश्री पुणे विद्यार्थीगृह विद्याभवन प्राथमिक मराठी शाळा नेरुळ यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पटसंख्या असणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा असा नावलौकिक असणा-या नमुंमपा शाळा क्रमांक ४२ घणसोली या ३,३०० हून अधिक पटसंख्या असणा-या शाळेचा विशेष गौरव करण्यात आला.
नमुंमपा शाळा क्रमांक ११८ पावणे, शाळा क्रमांक ११६ सानपाडा व शाळा क्रमांक १२२ कोपरखैरणे गाव या तीन शाळांचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागल्याने त्यांना गौरविण्यात आले. इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक शाळांतील शिक्षकांना तसेच प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत परसबाग निर्मिती स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणा-या शाळांचाही सन्मान करण्यात आला. सर्वाधिक इन्स्पायर ॲवॉर्ड मिळालेल्या शाळा तसेच यंग साईन्टीस्ट इंडिया स्पेस कीड्झ इंडिया आयोजित सायन्स प्रोजेक्ट्स कॉम्पिटीशनमध्ये चेन्नई येथील अंतिम फेरीत सहभागी झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाच शाळांनाही सन्मानित करण्यात आले.
दहावीच्या शालांत परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून प्रथम तीन क्रमांक मिळविणा-या तसेच विषयनिहाय सर्वोत्तम गुण संपादन करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकवृंदास सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना व आठवी एनएमएमएस परीक्षेमध्ये मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यासोबतच वैयक्तिक गायन, एकपात्री नाट्यभिनय, कॅरम, बुध्दीबळ, हस्ताक्षर, रांगोळी, निबंध, वर्गसजावट स्पर्धेत पारितोषिक पटकविणा-या शिक्षकांनाही सन्मानित करण्यात आले. फुटबॉल व इतर क्रीडा प्रकारात नावलौकिकप्राप्त विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक तसेच कलावंत शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचा-यांनाही गौरविण्यात आले.
“नवीन घडविण्याची क्षमता असतो तोच शिक्षक होतो” – प्रा. अशोक बागवे
शिक्षक गुणगौरव सोहळ्याच्या निमित्त आयोजित विशेष व्याख्यानात सुप्रसिध्द कवी, साहित्यिक प्रा. अशोक बागवे यांनी ‘गुरु’ या शब्दाची उकल करीत शिक्षकाचे समाजातील महत्व विविध गोष्टी सांगत अधोरेखीत केले. विविध कविता, अभंग यांचे दाखले देत त्यांनी चांगले विद्यार्थी घडविणे हे शिक्षकाचे ‘सेफ डिपॉजिट वॉल्ट’ असल्याचे सांगितले.
‘नवीन काहीतरी घडविण्याची क्षमता असतो तोच शिक्षक होतो’ असे सांगत त्यांनी महाराष्ट्राचे व देशाचे भविष्य मुलांच्या रुपात घडविण्याची संधी शिक्षकांना लाभली आहे त्याचे सोने करावे असे आवाहन केले. शिक्षकाने मुलांच्या मनातले ओळखले पाहिजे, जो ते ओळखतो तो मुलांचा आवडता शिक्षक होतो हे लक्षात घेऊन तसा शिक्षक बनण्याचा प्रयत्न करा असे ते म्हणाले. अभिजात मराठी भाषेचा अभिमान अविष्कृत करताना प्रा. अशोक बागवे यांनी भावना घेऊन जी भाषा येते, ती आपली भाषा म्हणूनच मला बोलीभाषा आवडतात असे सांगत ‘जी नष्ट होत नाही, जी अक्षय आहे, ती अभिजात’ अशा शब्दात मराठी भाषेचा गौरव केला. कार्यक्रमाचा प्रारंभ नमुंमपा शाळा क्र. १५, शिरवणे मधील विद्यार्थांनी सुरेल स्वागत गीताने केला. शाळा क्र. ४२, घणसोलीच्या शिक्षिका शोभा बुक्कानुरे यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात आपल्या भावना व्यक्त केल्या.
