“प्रत्येक कृती महत्त्वाची, त्याचप्रमाणे प्रत्येक प्रवास महत्त्वाचा”: रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी व्यक्त केले मनोगत
मुंबई, दि. ०७: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल दि. ०६/०१/२०२५ रोजी मुंबईत ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२५’ चे उद्घाटन केले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने आयोजित “सुरक्षा रीलोडेड” कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व उपस्थितांसह, वचनबद्धतेच्या प्रतिकात्मक स्वरुपात, रस्ते सुरक्षा अभियानाची प्रतिज्ञा घेतली. रस्ते सुरक्षेचे भविष्य आजच्या युवावर्गांच्या हातातच असणार आहे, हे लक्षात घेवून तरूणांमध्ये संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे; तसेच त्यांना सामायिक जबाबदारीची जाणीव असली पाहिजे असे गडकरी यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या इयत्ता ९वी ते १२वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांशी मंत्री नितीन गडकरी यांनी संवाद साधला. त्यांना आपले सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी रस्ता सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगितले.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, “रस्ते सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत ‘सुरक्षा रीलोडेड’ कार्यक्रमात आज आपण सहानुभूती, जागरूकता आणि सामायिक वचनबद्धता यासाठी आमच्या तरुणांना- जे रस्ता सुरक्षेचे भावी शिलेदार आहेत, त्यांना प्रेरणा देण्यासाठी एकत्र आलो आहोत..” “प्रत्येक कृती महत्वाची, प्रत्येक प्रवास महत्वाचा आहे आणि प्रत्येक प्रवास हा जबाबदारीने केला पाहिजे, यावर मंत्री नितीन गडकरी यांनी भर दिला. ‘रस्त्याचे नियम पाळले तर भविष्यात अपघात होणार नाहीत’,यासाठीच सर्वांनी नियम पाळण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांनी केले. त्यांनी माहिती दिली की, गेल्या वर्षी १८ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या १०,००० हून अधिक मुलांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला होता. रस्ते अपघातातील ६६.४ टक्के बळी हे १८ ते ४५ वयोगटातील आहेत. रस्ते अपघातांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. गडकरी यांनी रस्ते अपघातात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सोसाव्या लागणाऱ्या व्यथा मांडल्या. यातील अनेक अपघात शाळा, महाविद्यालयांसमोर घडतात, असेही ते म्हणाले.

यावेळी नितीन गडकरी यांनी उपस्थित तरुण विद्यार्थ्यांना शाळेत जाताना काळजीपूर्वक रस्ता ओलांडण्याचे आवाहन केले. तसेच तरुण अल्पवयातच गाडी चालवायला लागतात, लहान वयात गाडी चालवून ३५,००० जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्यास पालकांवर ज्या कायद्याद्वारे गुन्हा नोंदवला जातो, त्याबाबत पालकांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. कुटुंबातील लहान मुलांसोबत रस्ता सुरक्षेबाबत ज्येष्ठांनी बोलावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.
ते म्हणाले की रस्ता सुरक्षेच्या नियमांचे पालन करून अनेक लोकांचे प्राण वाचवले जाऊ शकतात. वाहन चालवताना काही गोष्टी करणे अगदीच सोपे आणि सहज शक्य आहेत, जसे की:
- मोबाईलवर बोलू नये.
- लाल (दिवा) सिग्नल असेल तर थांबणे.
- स्कूटर चालवायची असेल तर हेल्मेट घालणे.
- तुम्ही गाडीत बसलात तर पुढे आणि मागे बेल्ट लावा.
- प्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन आणि शिलाँग चेंबर कॉयर यांनी “सुरक्षा रीलोडेड” कार्यक्रमात सादरीकरण केले.
