९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उदगीरनगरी सज्ज
लातूर: लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं उद्यापासून ९५ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु होत आहे. उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू होणाऱ्या या संमेलन स्थळाचं ‘भारतरत्न लता मंगेशकर साहित्यनगरी’ असं नामकरण करण्यात आलं आहे. या संमेलनासाठी देशभरातल्या सुमारे एक हजारांहून अधिक मराठी साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी शहरातल्या मुख्य मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. संमेलनाचं उद्घाटन उद्या सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात मान्यवर साहित्यिकांची भाषणं, विविध विषयांवर परिसंवाद, निमंत्रितांचं कविसंमेलन, यासह विविध कार्यक्रम होणार आहेत.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल गायक अजय – अतुल यांचा संगीत रजनीचा कार्यक्रम पार पडला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. दरम्यान, उदगीर इथं २३ आणि २४ एप्रिलला विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत असून या संमेलनासाठी जिल्हा परिषदेच्या मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. संमेलनस्थळाला महात्मा बसवण्णा वचन साहित्यनगर. असं नाव देण्यात आलं आहे.