महात्मा बसवेश्वर यांची ८९१वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे शिवा संघटनेचे आवाहन
मुंबई, दि.३०(विठ्ठल ममताबादे): जगातील पहिले महात्मा, लोकशाहीचे आद्यजनक, जगात सर्वप्रथम शिवानुभव मंटप नावाने लोकशाहीची संसद स्थापन करणारे, सर्वधर्मसमभाव जोपासणारे, महान क्रांतिकारक, वीरशैव-लिंगायत धर्माचे प्रचारक प्रसारक, क्रांतीसुर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांची दरवर्षी अक्षय तृतियेच्या शुभमुहूर्तावर भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जाते. समाजात समानता-न्याय-बंधुता आदी मूल्ये रुजविण्यात महात्मा बसवेश्वर यांचे खूप मोठे योगदान आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना त्यांनी सामानतेची, प्रेमाची, बंधुताची शिकवण दिली. सर्व जाती धर्मातील नागरिक त्यांचे शिष्य होते. त्यामुळे त्यांची जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळ आदी ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे आवाहन शिवा अखिल भारतीय युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक जपूती 2200/819/प्र. क्र 89/2000/29 दिनांक १२ एप्रिल २००१च्या आदेशानुसार (GR नुसार) महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय, महामंडळे आदी ठिकाणी महात्मा बसवेश्वर जयंती अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर साजरी करणे बंधनकारक आहे. तरी अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी केली जात नाही हा शासन निर्णयाचा अवमान आहे. हा महापुरुषाचा अवमान आहे. त्यामुळे महापुरुषांचा अवमान न करता, शासनाच्या नियमांचे पालन करत, GR चे पालन करत महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्याचे आवाहन प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केले आहे.
महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंतीचा शासनाकडून जी आर काढण्यापासून आरक्षणासह वीरशैव-लिंगायत समाजाचे अनेक प्रश्न यशस्वीरित्या मार्गी लावणा-या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त मोठ्या उत्साहात द्वि पंधरवाडा साजरा केला जातो. एकूण एक महिना हा द्वि पंधरवडा उत्सव चालतो. महाराष्ट्राच्या मंत्रालयात अक्षय तृतीयेच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पुजनाने याची सुरुवात होणार आहे. तर या द्वि पंधरवड्याचा समारोप दिनांक ४/५/२०२२ रोजी मुंबई मधील यशवंतराव चव्हाण सभागृहात शासनाच्या वतीने देण्यात येणारा महात्मा बसवेश्वर सामाजिक शिवा समता पुरस्काराने याची सांगता होणार असल्याची माहिती प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी दिली आहे.
