लातूरमध्ये पाण्याच्या कमतरतेने उडाला हाहाकार, लोकं चिंतेत
लातूर: महाराष्ट्रातला बराचसा भाग सध्या दुष्काळाने होरपळून निघत आहे. त्यातच पाण्याच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की सरकारी पाण्याचे टँकर इथे फक्त एकदाच येतात, आम्हाला केवळ २५० लिटर पाणी मिळालं आहे. आम्हाला पिण्याचं पाणी वेगळं विकत घ्यावं लागतं. कमी पाऊस झाल्यामुळे, पिकं वाढू शकत नाहीत. रोजगाराचं दुसरं कोणतंच साधन नाही.
लातूर हा महाराष्ट्रातला एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. समुद्र सपाटीपासून साधारण ६६६ मीटर उंचीवर असलेल्या या जिल्ह्यात पाण्याची सदानकदा वानवा असते. लातूर शहरातही गेल्या १०० वर्षातला सर्वात मोठा दुष्काळ या वर्षी पडल्याचे मानले जाते. लातूर हे डाळींसाठी प्रसिद्ध आहे. देशातले तूर डाळीचे भाव येथूनच ठरतात. मोठमोठे नेतेही लातूर ने महाराष्ट्राला व देशाला दिले. पण मुंबईपासून ५०० किमी दूर असलेला हा भाग पाण्याच्या दुर्भिक्ष्याने मोठ्याप्रमाणात त्रस्त झाला आहे.