Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“काश्मीर फाइल्सने काश्मिरी पंडितांची शोकांतिका पडद्यावर दाखवून त्यांचे वेदनांचे घाव भरण्याची प्रक्रिया सुरू केली” – अनुपम खेर

‘चित्रपटातील माझे अश्रू आणि वेदना खऱ्या आहेत’

गोवा, दि. २३: ‘काश्मीर फाईल्स’ मुळे जगभरातील लोकांना १९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांची जाणीव होण्यास मदत झाली, असे चित्रपटातील प्रमुख अभिनेते अनुपम खेर म्हणाले. गोव्यातील पणजी येथे ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त आयोजित इफ्फी टेबल टॉक्समध्ये ते सहभागी झाले होते.

“हा सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे. चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटासाठी जगभरातल्या  सुमारे ५०० लोकांच्या मुलाखती घेतल्या. १९ जानेवारी १९९० च्या रात्री वाढत्या हिंसाचारामुळे काश्मीर खोऱ्यातील ५ लाख काश्मिरी पंडितांना त्यांची घरे आणि तिथल्या आठवणी मागे सोडून जावे लागले. एक काश्मिरी हिंदू म्हणून मी या दुःखद घटनांसोबत  जगलो. मात्र असे काही घडले हे कुणीच मान्य करत नव्हते. जग ही शोकांतिका लपवण्याचा प्रयत्न करत होतं. या चित्रपटाने पडद्यावर ही शोकांतिका दाखवून त्यांचे वेदनांचे घाव भरण्याची  प्रक्रिया सुरू केली” असे अनुपम खेर पुढे म्हणाले.

त्यांनी भोगलेली शोकांतिका पुन्हा जागवताना अनुपम खेर म्हणाले की, द काश्मीर फाईल्स हा त्यांच्यासाठी केवळ एक चित्रपट नाही, तर त्यांनी पडद्यावर चित्रित केलेली एक भावना आहे.  “ज्या लोकांना त्यांच्या घरातून हाकलून देण्यात आले,  त्यांचे मी प्रतिनिधीत्व करत असल्याने, ते शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने व्यक्त करणे ही माझी मोठी जबाबदारी होती असे मी मानतो. माझे अश्रू, माझ्या वेदना ज्या तुम्ही या चित्रपटात पाहत आहात ते सगळे खरे आहे,” असे ते म्हणाले.

अनुपम खेर पुढे म्हणाले की, या चित्रपटात आपल्या कलेचा अभिनेता म्हणून वापर करण्याऐवजी, वास्तविक जीवनातील घटनांमागील सत्याला अभिव्यक्ती देण्यासाठी त्यांनी आपल्या आत्म्याचा वापर  केला. कधीही हार मानू नका ही या चित्रपटामागील मुख्य संकल्पना असल्याचे  त्यांनी अधोरेखित केले.

“कोविड महामारी आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनचा चित्रपट पाहण्याच्या लोकांच्या पद्धतीवर परिणाम झाला आहे, या वस्तुस्थितीवर अधिक भर देत अनुपम खेर म्हणाले की, ओटीटी  प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांना जागतिक चित्रपट आणि बहुभाषिक चित्रपट पाहण्याची सवय लागली आहे. “प्रेक्षकांना वास्तववादी चित्रपट आवडू लागले. ज्या चित्रपटांमध्ये वास्तवाचा घटक आहे ते नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भिडतील. काश्मीर फाईल्स सारख्या चित्रपटांचे यश हे त्याचेच द्योतक आहे. कुठलीही गाणी, विनोद नसलेला हा चित्रपट अजूनही सरस ठरत आहे. हाच  खरे तर सिनेमाचा विजय आहे”, असे ते म्हणाले.

उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना एक सल्ला देताना  ते म्हणाले की आपण एका विशिष्ट भाषिक चित्रपट उद्योगातले आहोत हा समज आपल्या मनातून काढून टाकायला पाहिजे. “त्याऐवजी, चित्रपट निर्मात्यांनी स्वतःला भारतीय चित्रपट उद्योगातले चित्रपट निर्माते म्हणून ओळखले पाहिजे जे विशिष्ट भाषेतील चित्रपट बनवतात.  हा एक लार्जर दॅन लाइफ चित्रपट उद्योग आहे.”

इफ्फीसोबतच्या प्रवासाची आठवण सांगताना  अनुपम खेर म्हणाले की, १९८५ मध्ये २८ वर्षांचा असताना  ‘सारांश’ या चित्रपटासाठी ते पहिल्यांदा इफ्फीमध्ये सहभागी झाले होते. “त्या चित्रपटात मी ६५ वर्षांची व्यक्तिरेखा साकारली होती, त्यामुळे तेव्हा मला इफ्फीमध्ये कोणीही ओळखले नाही. त्यानंतर  ३७ वर्षांत  ५३२ हून अधिक चित्रपट केल्यानंतर इफ्फीसाठी पुन्हा गोव्यात येणं हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे, हा महोत्सव एक प्रतिष्ठित महोत्सव आणि जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट महोत्सवांपैकी  एक बनला आहे,” असे ते म्हणाले.

या संवादादरम्यान अनुपम खेर यांनी जाहीर केले की ते प्रतिक्षा या ओडिया चित्रपटाची निर्मिती करतील. यात बेरोजगारी एक प्रमुख विषय असून वडील आणि मुलाची कथा आहे, त्यांनी एक प्रमुख भूमिका केली आहे. ‘प्रतीक्षा’चे दिग्दर्शक अनुपम पटनायक हे देखील महोत्सवाच्या ठिकाणी पत्र सूचना कार्यालयाने प्रसारमाध्यमांबरोबर  आयोजित केलेल्या संवादात सहभागी झाले  होते.  काश्मीर फाईल्सचे निर्माते अभिषेक अग्रवाल हे देखील या संवादात सहभागी झाले होते.  ते म्हणाले की या चित्रपटाने त्यांची निवड केली, त्यांनी चित्रपट निवडला नाही.

रूपरेषा:

कृष्णा पंडित हा एक तरुण काश्मिरी पंडित निर्वासित असून तो  त्याच्या आजोबांसोबत राहतो, ज्यांनी १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या नरसंहार पाहिला होता आणि त्यांना काश्मीरमधून पळून जावे लागले होते. पुष्करनाथ पंडित यांनी  कलम ३७० रद्द व्हावे यासाठी आयुष्यभर लढा दिला होता. कृष्णाला वाटत असते की त्याच्या आई-वडिलांचा काश्मीरमध्ये अपघातात मृत्यू झाला. कृष्णा पंडित हा जेएनयूचा विद्यार्थी असून  त्याच्यावर  मार्गदर्शक  प्राध्यापिका  राधिका मेननचा प्रभाव असतो आणि त्यामुळे तो त्या नरसंहाराचे खंडन करतो आणि स्वतंत्र काश्मीरसाठी लढतो. मात्र  आजोबांच्या मृत्यूनंतरच त्याला सत्य काय आहे ते कळते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *