“असे हल्ले महाराष्ट्रात सहन केले जाणार नाहीत” जेएनयू हिंसा प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा
मुंबई: काल नवी दिल्लीतील जेएनयू मधील वस्तीगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “युवक हे आपले उद्याचे आधारस्तंभ आहेत. त्यांची विचारधारा ही महत्त्वाची आहे. युवक आपल्या वसतिगृहात सुरक्षित नसतील हे देशाला कलंक असल्यासारखे आहे.”
पुढे ते म्हणाले की, “तरुण हे बॉम्ब सारखे आहेत त्यांना भडकवू नका. तरुणांचा उद्रेक बाहेर येतोय. मी संपूर्णपणे तरुणांच्या सोबत आहे त्यांनी घाबरायचे कारण नाही. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही.”
सर्व युवक हे महाराष्ट्रात सुरक्षित आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही जर काही झाले तर आम्ही माफ करणार नाही. असे हल्ले महाराष्ट्रात सहन केले जाणार ही नाहीत असे म्हणत त्यांनी थेट भाजपप्रणित संघटनांना इशारा दिला.
पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
१. बुरखाधारी चेहरे समोर आले पाहिजेत. ते डरपोक आहेत. त्यांच्यात हिम्मत नाही आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
२. डरपोकांचे समर्थक हिंदुस्थानात नसतात.
३. हल्लेखोर देशासमोर यावेत. यात मला राजकारण करायचे नाही. निःपक्ष पणाने याची चौकशी झाली पाहिजे.
४. JNU हल्ला यावर राजकारण नको.
५. काही जण भातुकलीचा खेळ खेळत आहेत त्यांना खेळू दे. (भाजप माजी मंत्री मुनगंटीवार यांच्या गुड़ी पाडव्याला सरकार बदलणार या वक्तव्यावर टोला)
६. अशोक गेहलोत हे सहज भेटायला आलेले होते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.