७० हून अधिक वर्षे रंगभूमीची केली सेवा
ठाणे, दि. २४: ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर याचं आज ठाण्यात निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. सावरकर यांच्यावर काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ७० हून अधिक वर्षे ते रंगभूमीवर कार्यरत होते. अण्णा या नावानं मनोरंजन विश्वात ते ओळखले जात असत. जयंत सावरकर यांनी अनेक लोकप्रिय मराठी नाटकांत काम केलं होतं. त्यात एकच प्याला, तुझे आहे तुजपाशी, व्यक्ती आणि वल्ली, हिमालयाची सावली, अपराध मीच केला, अपूर्णांक, अलीबाबा चाळीस चोर, अल्लादीन जादूचा दिवा, अवध्य, आम्ही जगतो बेफाम, दिवा जळू दे सारी रात, वरचा मजला रिकामा, सूर्यास्त यांसारख्या अनेक मराठी नाटकांचा समावेश होतो.
नाटकांबरोबरच सावरकर यांनी हिंदी, मराठी मालिका तसेच वेब सीरिजमध्येही काम केलं होतं. सावरकर यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. सावरकर यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यात विष्णुदास भावे पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार, अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये जीवन गौरव पुरस्कारांचा समावेश आहे. मी एक छोटा माणूस हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं आहे. आपल्या दमदार आणि कसदार अभिनयाने रसिकांच्या मनात घर करून राहिलेला, दोन पिढ्यांना जोडणारा ज्येष्ठ रंगकर्मी आपण गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकर यांना आदरांजली अर्पण केली. ते एक हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व होतं.
फोटो सौजन्य – गूगल