अखेर बारावीच्या परीक्षा रद्द, राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा
मुंबई, दि.३: राज्यातल्या बारावीच्या परीक्षा रद्द कऱण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला आज मंजुरी मिळाली आहे. आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
इयत्ता १२वीच्या परीक्षेच्या संदर्भात महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत काल चर्चा झाली. याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवला जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या.
राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात राज्यांनीही १०वी व १२वी परीक्षा केल्या रद्द
राजस्थान सरकारने राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. काल मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणं शक्य नसल्यामुळे, विद्यार्थ्यांचं हीत लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं राज्यचे शिक्षण मंत्री गोविंद सिंग दोतासरा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. राजस्थान पाठोपाठ गुजरात आणि मध्य प्रदेश राज्य सरकारांनी देखील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.