मुंबईत आजपासून झाला प्रारंभ
मुंबई, दि. २७: मुंबईत आजपासून शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सव सुरु होत आहे. पद्म पुरस्कार प्राप्त आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट-कर्मी प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अप्पाथा’ या तामिळ चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरनं या महोत्सवाची सुरुवात होणार आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री मीनाक्षी लेखी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ सिने अभिनेत्री हेमा मालिनी, दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अभिनेत्री उर्वशी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. शांघाय सहकार्य संघटनेच्या भारताच्या अध्यक्षपदाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात शांघाय सहकार्य संघटनेच्या देशांचे एकूण ५७ चित्रपट प्रदर्शित केले जातील. महोत्सवाच्या स्पर्धा विभागात १४ फिचर फिल्म, तर बिगर-स्पर्धा विभागात ४३ चित्रपट दाखवले जातील. निखिल महाजन दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘गोदावरी’ आणि पान नलीन यांच्या ‘छेल्लो’ या गुजराती चित्रपटाला स्पर्धा विभागासाठी नामांकन मिळालं आहे. बिगर-स्पर्धा विभागात प्रदर्शित होणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये सरदार उधम, आरआरआर (RRR), गंगुबाई काठियावाडी, तुलसीदास जुनिअर हे चित्रपट, जुगलबंदी हा लघुपट, तर शतरंज के खिलाडी या चित्रपटासह पुनर्संचयित करण्यात आलेले पाच चित्रपटांचा समावेश आहे.
या सर्व चित्रपटांना इंग्रजी सब टायटल्स, अर्थात उप-शीर्षकं असतील.चित्रपटांच्या प्रदर्शना व्यतिरिक्त या महोत्सवात मास्टर-क्लास हे संभाषण सत्र, देश आणि राज्य पॅव्हिलियन, फोटो आणि पोस्टर प्रदर्शन, हस्तकला स्टॉल यासारखे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.
Source – AIR