“बासमती तांदळामध्ये नैसर्गिक सुगंध असणं आवश्यक” – FSSAI कडून जाहीर
नवी दिल्ली, दि. १२: FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं प्रथमच बासमती तांदळासाठी सर्वसमावेशक नियामक मानकं निर्धारित केली आहेत. या मानकांनुसार, बासमती तांदळामध्ये नैसर्गिक सुगंध असणं आवश्यक आहे. तसंच हा तांदूळ कृत्रिम रंग, पॉलिश करण्यासाठीची रसायनं आणि कृत्रिम सुगंधांपासून मुक्त असावा. धान्यांचा सरासरी आकार, आर्द्रतेची कमाल मर्यादा, यूरिक ऍसिड आणि खराब झालेलं धान्य याबाबत सुद्धा ही मानकं गुणवत्तेचे मापदंड निश्चित करतात.
बासमती तांदळाच्या व्यापारात न्याय्य पद्धती प्रस्थापित करणं आणि देशांतर्गत तसंच जागतिक स्तरावर ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणं हे या मानकांचं उद्दिष्ट आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. ही मानकं या वर्षी १ ऑगस्टपासून लागू केली जाणार आहेत. बासमती तांदळाचं उत्पादन मुख्यतः भारतीय उपखंडात हिमालयाच्या पायथ्याशी घेतलं जातं. जागतिक बाजारपेठेत बासमती तांदळाच्या एकूण पुरवठ्या पैकी भारत सुमारे दोन तृतीयांश तांदळाचा पुरवठा करतो.