….म्हणून खासदार संभाजीराजेंनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार
कोल्हापूर: दोन दिवसांपूर्वी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मातोश्री येथे राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांजवळ ३ मुद्दे मांडले. त्यातही विशेष म्हणजे ‘सारथी’ बाबत त्यांनी तात्काळ दखल घेण्याची विनंती केली.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे यांना फोन करत त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे सांगितले. याबाबत माध्यमांना माहिती देताना ते म्हणाले, “हजारो मराठा तरुणांचे भविष्य सुरक्षीत झाले. सारथी ची स्वायत्तता कायम ठेवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आत्ताच मला फोन करून सांगितले. संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि कौतुक ही करतो.
दोन दिवसापूर्वी मी त्यांची भेट घेऊन सारथी विषयी बोललो होतो. त्यांनतर काल मी सारथी संस्थेला भेट देऊन पूर्ण माहिती घेतली. कुणीतरी जे. पी. गुप्ता नावाचा एक अधिकारी मनमानी करत असल्याचे लक्षात आले. त्याचा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला होता. हे एक मोठे षडयंत्र असल्याचे मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्याबाबत काल जाहीर वक्तव्य ही केलं होतं.
काही वेळापूर्वी मला स्वतः उद्धव ठाकरे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की, राजे, आपल्या सर्व मागण्या मी मान्य केल्या आहेत. डी. आर. परिहार यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. त्यांची नियुक्ती कायम राहील असेही ते म्हणाले.
परत एकदा सर्व मराठा समाजाच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो.”