“आम्ही किती दिवस कंत्राटी कामगार म्हणून जगायचं? मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचा प्रशासनाला सवाल
मुंबई: राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण जेव्हा मिळाला तेव्हापासून ते आजपर्यंत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यात पहिला क्रमांक लागतो तो मुंबईचा. मुंबईत सध्या डॉक्टरर्स, नर्स, वॉर्डबॉय, पोलीस यांच्याच जोडीला मुंबई महानगरपालिकेचा सबंध स्वच्छता विभाग दिवसरात्र मेहनत घेताना दिसतो आहे. परंतू यातील कंत्राटी कामगार मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत.
दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागात काम करणारे एक कंत्राटी कर्मचारी उमेश रमेश भंडारे यांनी सर्व कंत्राटी कामगारांची कैफियत महाराष्ट्र वार्ता कडे मांडली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व महापालिका आयुक्त यांना उद्देशून ते म्हणाले की,
मुंबई महानगर पालिका आयुक्त,
महाराष्ट्र राज्याचे मुखमंत्री श्री. उध्दव ठाकरे,
आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री. राजेश टोपे साहेब व आरोग्य सबंधित खात्याचे संपूर्ण अधिकारी वर्ग या सर्वांना ठेकेदारी कामगारांची पुढीलप्रमाणे विनंती आहे.
गेले अनेक वर्ष आम्ही ‘बीएमसी’ मध्ये PCU विभागात कंत्राटी पद्धतीने काम करत आहोत. आता सध्या लॉक डाऊन आहे तरीही आम्ही मुंबई मध्ये रस्ते साफ करत आहोत, गटारे साफ करत आहोत, झोपडपट्टीमध्ये गल्लोगल्ली जाऊन कचरा साफ करत आहोत. काही कामगार पेशंटची सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये करत आहेत तर काही कामगार या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून सॅनिटायझरिंग करत आहोत. शासन सध्याला वेगवेगळ्या कामगार भरती करत आहे. आमचा कामगार भरतीसाठी विरोध नाही परंतु आम्ही किती दिवस कंत्राटी कामगार म्हणून जगायचं. आमच्या बरोबर कायम स्वरूपाची जे कामगार काम करत आहेत ते कामगार आम्हास अडचणीच्या ठिकाणी घाणीच्या ठिकाणी, जीवाला धोका होईल अशा ठिकाणी आम्हास पाठवतात. उदाहरणार्थ ज्या विभागामध्ये कोरोनाच्या Positive केसेस सापडलेल्या आहेत, त्या विभागामध्ये कायम स्वरूपाचे कामगार न जाता कंत्राटी कामगारांना सॅनिटायझरिंग ची फवारणी करण्यासाठी कंत्राटी कामगारांना पाठवले जाते. मग अशा स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी करून घेण्यास (पर्मनंट) काय हरकत आहे.
तरी वरील सर्व अधिकारी वर्ग, मंत्री गण यांना कंत्राटी कामगारांकडून विनंती आहे की जे जे कंत्राटी कामगार काम करतात त्यांना सेवे मध्ये थोडे थोडे करून कायम करण्यात यावे. ही आम्हा सर्व कंत्राटी कामगारांची व आमच्या कुटुंबाची विनंती आहे.”
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबई महानगरपालिकेत नव्याने कामगार भरती सूरु झाली आहे. परंतू तत्पूर्वी आपल्या जीवाची पर्वा न करणाऱ्या स्वच्छता व आरोग्य विभागातील अनुभवी अशा जुन्या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे गरजेचे आहे.