केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ७८४.३५ कोटी रुपयांच्या भारतमाला प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यामधून जाणार्या महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पाला दिली मंजूरी
जळगाव, दि. २०: भारतमाला या ७८४.३५ कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील जळगाव आणि मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या एनएच-753 एलच्या शाहपूर बायपास ते मुक्ताई नगर या भागाच्या चौपदरीकरणाला हायब्रीड अॅन्युइटी मॉडेलखाली मंजूरी देण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट संदेशमालिकेतून ही माहिती दिली. भौगोलिकदृष्ट्या पाहता हा प्रकल्प मार्ग मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्हा आणि महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात आहे. सध्याचा दुपदरी कॅरेजवे मार्ग हा एनएच-753 एलचा एक भाग आहे, तो पहूरजवळील एनएच-753एफच्या जंक्शनपासून सुरू होतो आणि मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूरला जोडतो. यात महाराष्ट्रातील जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर आणि खांडवाजवळील एनएच-347बी याचाही समावेश आहे. प्रकल्प मार्गातील दापोरा, इच्छापूर आणि मुक्ताईनगर येथे आवश्यक ठिकाणी बायपासची तरतूद केली आहे असे नितीन गडकरी यांनीम्हटले आहे. बोरेगाव बुद्रूक ते मुक्ताई नगर या संपूर्ण रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यानंतर इंदूरहून छत्रपती संभाजी नगरकडे (औरंगाबाद) जाणारी वाहतूक या मार्गाने वळवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.