Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादी चा ‘निकाल’ लावला !

शरद पवारांना धक्का ! अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा विधानसभा अध्यक्षांचा निकाल

मुंबई, दि. १५: महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणातला निर्णय आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. अजित पवार यांच्या गटाला ४१ आमदारांचा पाठिंबा असल्याचे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितले. अजित पवारांना शरद पवारांपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष आहे असे ते म्हणाले.

अजित पवार गटाकडून अनिल पाटील आणि समीर भुजबळ सुनावणीला उपस्थित होते. तर शरद पवार गटाचे वकीलच आले होते. शरद पवार गटाच्या वतीने तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी अजित पवार गटाच्या वतीने दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. एकूण पाच याचिका होत्या ज्या दोन भागात विभागल्या होत्या, गट १ आणि गट २.

राहुल नार्वेकर म्हणाले की, राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही. फक्त एक गट तयार झाला आहे. प्राथमिक स्तरावर त्यांनी पक्ष रचना, घटना आणि विधिमंडळ संख्या या तीन गोष्टींवर आपला निर्णय दिला. ते म्हणाले की, ३० जून २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. २९ जूनपर्यंत शरद पवार यांच्या नेतृत्वावर प्रश्नच नव्हता. राष्ट्रवादी घटनेबाबत कोणताही वाद नाही.

अजित पवार यांना ५३ पैकी ४१ आमदारांचा पाठिंबा असल्याचं नार्वेकरांनी सांगितलं. दोन्ही गटांनी परस्परांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळं अजित पवारांच्या सोबतच्या आमदारांना पात्र ठरवतांना नार्वेकर यांनी शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनाही पात्र ठरवलं आहे. २९ जूनपर्यंत शरद पवार यांच्या अध्यक्ष पदाला कोणीही आव्हान दिलं नव्हतं. ३० जून रोजी पक्षात फूट पडली आणि दोन गट तयार झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेनुसार कार्यकारिणी सर्वोच्च आहे. मात्र त्यावर झालेल्या अनेक नियुक्ती पक्षाच्या घटनेतल्या तरतुदींचं उल्लंघन करणाऱ्या होत्या, असं निरीक्षण नार्वेकर यांनी नोंदवलं. विधानसभा अध्यक्षांनी आजच्या निकालात घटनेच्या १० व्या परिशिष्टाचा गैरवापर झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. पक्षातले मतभेद दडपण्यासाठी १० व्या परिशिष्टाचा वापर करता येणार नाही. पक्षांतर्गत मतभेद आणि पक्षांतर यात फरक आहे. पक्षांतर्गत मतभेद अथवा नेतृत्वाला विरोध ही पक्षविरोधी कारवाई ठरू शकत नाही, असं मत नार्वेकर यांनी आजच्या निकालात नोंदवलं. तसंच पक्षांतर्गत वाद सोडवण्याचे काम विधानसभा अध्यक्षांचं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवार यांच्यासोबत असलेले खासदार सुनिल तटकरे यांनी या निकालाचं स्वागत केलं आहे. सर्व कायदेशीर बाबींचा विचार करुन नार्वेकर यांनी हा निकाल दिला आहे. शरद पवार यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी होती, त्यामुळं एवढ्या मोठ्या संख्येनं आमदार बाहेर पडल्याचं ते म्हणाले. या निकालात आश्चर्यजनक काहीही नसल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांच्यासोबत असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असून तिथेच दाद मागू. प्रादेशिक, मराठी पक्षांना कमकुवत करण्यासाठी हे प्रकार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *