अदानी समूहातल्या कथित गैरव्यवहारांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी – नाना पटोले
मुंबई, दि. २९: अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र विशेष तपास पथका मार्फत करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. भारतीय स्टेट बँक आणि आयुर्विमा महामंडळ-एलआयसी सह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील सामान्य जनतेचा पैसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अदानींच्या विविध कंपन्यांमध्ये कोणताही विचार न करता गुंतवला, असा आरोप त्यांनी केला. आता हे कोट्यवधी रुपये बुडण्याची भिती निर्माण झाली आहे असा दावा पटोले यांनी केला आहे.
मोदी सरकारनं अदानींच्या कंपन्यांवर विशेष मर्जी दाखवत भारतीय स्टेट बँकेकडून कोट्यवधी रुपयांचं कर्ज दिलं. देशातील सर्वात मोठी आणि सामान्य गुंतवणुकदारांची विमा कंपनी एल आय सी मधील ७४ हजार कोटी रुपये अदानींच्या कंपनीत गुंतवले. अदानी हे जगातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले ते केवळ मोदी सरकारच्या आशीर्वादामुळेच, असे आरोपही पटोले यांनी केले. अदानींचा गैरकारभार पाहता सरकारनं धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीकडून काढून घ्यावा, असही पटोले म्हणाले.