पुनरुथान झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे भारत आत्मविश्वासानं पुढं जाईल- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विश्वास
कठिण परिस्थितीतही देशाची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असून यामुळे अधिक उत्तम कार्य करण्यासाठी केंद्रसरकारला नवीन उर्जा आणि आत्मविश्वास मिळत आहे, असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल मुंबईत एका खासगी वाहिनीशी बोलताना व्यक्त केलं.
वित्तीय तूट भरुन काढण्यासह इतर आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारनं आपला खिसा काहीसा सैल केला आहे, आर्थिक वृद्धीसंदर्भात सरकार अजिबात साशंक नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
देशात पायाभूत सोईसुविधा प्रकल्पांच्या गुंतवणूकीसाठी सुमारे १०२ लाख कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे, आणि त्यासाठी सरकारची भिस्त मोठ्या प्रमाणावर खासगी उद्योगांवर आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
केंद्रसरकारनं अलीकडेच कॉर्पोरेट कर आणि प्राप्तीकरात कपात केली असून त्यायोगे बाजारात व्ययाचं प्रमाण वाढून पैसा खेळता राहील, असं त्या म्हणाल्या. याशिवाय बँकांनी विविध श्रेण्यांमधे कर्जसुविधा उपलब्ध करुन द्यावी, याकरता, अर्थमंत्रालय अनेक उपाययोजना आखत आहे, असं त्यांनी सांगितलं.
Credit – AIR