भारतीय तटरक्षक दलाने अलिबागजवळ अडकलेल्या जहाजावरील जेएसडब्ल्यूच्या(JSW) १४ कर्मचाऱ्यांची केली सुटका
अलिबाग, दि. २६: भारतीय तटरक्षक दलाने (ICG) दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास, रायगड जिल्ह्यातील अलिबाग किनाऱ्यावरीलजवळून जेएसडब्ल्यू या जहाजावरच्या बल्क कॅरिअरमधे अडकलेल्या १४ भारतीय कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. २५ जुलै २०२४ रोजी १३:२७ वाजता जहाजावरील वाहकाकडून भारतीय तटरक्षक दलाच्या सागरी बचाव समन्वय मुंबई केंद्रात (MRCC) संकटग्रस्त असल्याचा फोन आला.
जहाजावर १४ भारतीय कर्मचारी असलेले हे १२२ मीटर लांबीचे जहाज अलिबागपासून अंदाजे एका समुद्री मैलांवरील खडकांवर आपटले. त्यावेळी नांगर अडकून राहणे (अँकर ड्रॅगिंग), इंजिन रूममध्ये पाणी भरत जाऊन त्यावरील नियंत्रण सुटणे,अशी परिस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती आणि परिसरातील खडकांचा धोका या पार्श्वभूमीवर, यावेळी एअरलिफ्ट हा एकमेव व्यवहार्य पर्याय बचाव करण्यासाठी उरला होता.
त्यानुसार, भारतीय तटरक्षक दलाने २६ जुलै २०२४ रोजी पहाटे बचाव कार्यास सुरुवात केली. प्रतिकूल हवामानाला तोंड देत, अतिशय धैर्याने तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने जहाजावरील सर्व १४ कर्मचाऱ्यांना बल्क कॅरियरमधून यशस्वीरित्या बाहेर काढले. कोणतीही दुखापत न होता चालक दलाला अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
भारतीय तटरक्षक दलाचे मुरुड जंजिरा स्थानक सध्या नाविकांना पुढील वैद्यकीय मदत आणि पाठबळ देण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे. जहाजाची सुरक्षा आणि सभोवतालच्या वातावरणाची खात्री करण्यासाठी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
