सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी रद्द केला होता ठाकरे सरकारच्या काळातील निर्णय
मुंबई, दि. १७: मुंबई उच्च न्यायालयाकडून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेतील वॉर्डसंख्येबाबत शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने निकाल देताना न्यायालयाने मुंबई महापालिकेतील वॉर्डांची संख्या २२७ राहणार असल्याचे सांगितले. माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी एक याचिका दाखल केली होती ज्यामध्ये त्यांनी बीएमसी वॉर्डांची संख्या २३६ पर्यंत वाढवण्याची विनंती केली होती. आज उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. आता येत्या निवडणुकीत मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या २२७ राहणार आहे. न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे आणि न्यायमूर्ती एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्या खंडपीठाने राजू पेडणेकर आणि समीर देसाई या दोन माजी नगरसेवकांच्या याचिकांवर सुनावणी करताना हा आदेश दिला.
‘आम्हाला याचिकांमध्ये काहीही तथ्य आढळले नाही’
याचिका फेटाळून लावताना खंडपीठाने सांगितले की, दोन्ही याचिकांमध्ये आम्हाला काहीही तथ्य आढळले नाही, त्यामुळे दोन्ही याचिका फेटाळत आहोत. शिंदे सरकारचा निर्णय घटनाविरोधी असल्याचे सांगत पेडणेकर यांनी हा निर्णय रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, असे ते म्हणाले होते. याशिवाय, राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वी केलेल्या सीमांकनाच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाने ४ मे आणि २० जुलै रोजी बीएमसीच्या निवडणुका घ्याव्यात, अशी प्रार्थना त्यांनी न्यायालयाकडे केली होती.
