खारघर उष्माघात दुर्घटनेत आतापर्यंत अधिकृत माहितीनुसार १२ जणांचा मृत्यू; मृतांचा खरा आकडा गुलदस्त्यात
नवी मुंबई, दि. १७: नवी मुंबईतील मोकळ्या मैदानात रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात उन्हाच्या तडाख्यात अधिकृत माहितीनुसार १२ जणांचा मृत्यू झाला. या कार्यक्रमात लाखो लोक सहभागी झाले होते. मुंबईच्या शेजारी असलेल्या रायगड जिल्ह्यातील खारघर परिसरात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आध्यात्मिक नेते आणि समाजसुधारक अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान केला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, नवी मुंबई आणि पनवेल शहरातील रुग्णालयांमध्ये काही रुग्ण ‘व्हेंटिलेटर’वर असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) रविवारी रात्री एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “कडक उन्हामुळे किमान ११ लोकांचा मृत्यू झाला आहे.” पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, काही रुग्ण बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले, तर काही अजूनही रुग्णालयात आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली दाखल आहेत.
घटनास्थळाच्या सर्वात जवळ असलेल्या हवामान केंद्रात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची भरपाई दिली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, “या घटनेमुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांवर मोफत उपचार केले जातील. त्याच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतून करेल. रुग्णांना अतिरिक्त उपचारांची गरज भासल्यास त्यांना विशेष रुग्णालयात पाठवावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
