देशातल्या सगळ्याच धार्मिक स्थळांवरचे भोंगे उतरवण्याचं राज ठाकरे यांचं आवाहन
दि. २: संपूर्ण देशातल्या सगळ्याच धार्मिक स्थळांवरचे भोंगे खाली आणायला हवे, गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रलंबित मुद्दा निकाली काढण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं जाहीर सभेत बोलत होते.
भोंगे हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे, मात्र त्याला धार्मिक रंग देणार असाल, तर उत्तरही धार्मिक पद्धतीनेच दिलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला. उद्या तीन तारखेपर्यंत जर मशिदींवरचे भोंगे उतरवले नाही, तर चार तारखेपासून सगळ्या मशिदींसमोर हनुमान चालिसा वाजवण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीय द्वेषाचं राजकारण सुरू झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. महापुरुषांचे विचार समजून न घेता, फक्त जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यावर भर दिला जात असल्याबद्दल ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. औरंगाबाद शहरात दहा दिवसांनी पिण्याचं पाणी मिळतं, याकडेही राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं. महाराष्ट्र गौरव गीत अजरामर करणारे शाहीर साबळे यांच्यावरच्या चित्रपटाच्या भित्तीपत्रक तसंच चित्रफीतीचं अनावरण ठाकरे यांच्याहस्ते यावेळी करण्यात आलं.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेनंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकारांशी बोलताना, भोंग्यांच्या विरोधात बोलताना, राज ठाकरे यांनी भोंग्याचा वापर करूनच सभा घेतल्याची, टीका केली. देशात आज अनेक मुद्दे आहेत, मशिदींवरचे भोंगे हा काही फार मोठा ज्वलंत मुद्दा नसल्याचं मत खासदार जलील यांनी व्यक्त केलं. मात्र भोंग्यांबाबत पोलिस प्रशासनानं काही सूचना करत असेल तर त्यांना सहकार्याची आपली भूमिका असल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं.